मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्यावर मुंबई पोलिसांकडून राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत येऊन मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठाण करणार असल्याचे सांगत इथल्या कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहचवण्याचा प्रयत्न या दाम्पत्याने केला असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. दरम्यान, याच प्रकरणातील जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. आमदार रवी राणा यांच्या विरोधात 17 केसेस आहे तर खासदार नवनीत राणांविरोधात 6 केसेस आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांचा या जामीनाला विरोध आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राणा दाम्पत्य बाहेर पडल्यावर पुन्हा कायदा सुव्यवस्था बिघडवण्याची शक्यता असल्याचा पोलिसांचा दावा आहे. दरम्यान, गुरुवारी राणा दाम्पत्याने घरचे जेवण मिळण्यासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या व्यस्त कामकाजामुळे या प्रकरणी गेल्या सुनावणीतच स्पष्ट करण्यात आले होते की, शक्य झाल्यास आम्ही शुक्रवारी ही सुनावणी घेऊ. त्यानुसार, काल याचिकाकर्त्या राणा दाम्पत्याच्या वकिलांनी युक्तीवाद केला. त्यांनी न्यायालयाला विनंती केली की, याचिकाकर्ते दाम्पत्य निवडून आलेले आमदार आणि खासदार आहेत.
हे प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी थोडा वेळ का होईना न्यायालयाला शक्य असल्यास ते युक्तीवाद करण्यास तयार आहेत. परंतु, न्यायालयाच्या वेळापत्रकानुसार, इतर महत्त्वाची प्रकरणंही सुनावणीसाठी आहेत. न्यायालयाकडे शुक्रवारी जराही वेळ नाही, असे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात येणार आहे.
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्याच्या जामिन याचिकेवर आज उत्तर देण्याचे निर्देश सत्र न्यायालयाच्यावतीनं राज्य सरकारला देण्यात आले होते. त्यानुसार, राज्य सरकारच्या वतीनं उत्तर दाखल करण्यात आलं. त्यानंतर आज दुपारी 12 वाजता ही सुनावणी घेण्याचं मुंबई सत्र न्यायालयानं निश्चित केलं आहे. जामीन याचिकेला उत्तर देताना राज्य सरकारनं राणा दाम्पत्याच्या जामीनाला जोरदार विरोध केला आहे.
राजद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याने आणि त्यांच्याविरोधात यापूर्वीही विविध पोलीस स्थानकांत इनेक गुन्हे दाखल असल्याने त्यांना जामीन देण्यात येऊ नये, तसेच जामीनावर बाहेर आल्यानंतरही तेढ निर्माण करणारी किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी वक्तव्य त्यांच्याकडून केली जाऊ शकतात, असे म्हटले आहे. तसेच, खासदार नवनीत राणा यांचा विशेष उल्लेखही राज्य सरकारकडून या उत्तरात करण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्याविरोधात खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच, मुलुंड पोलीस स्थानकातही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दाम्पत्याला जामीन देऊ नये, असे म्हणत राज्य सरकारने आपली बाजू मांडली आहे.