Ramdas Kadam : राज्यात मागील काही महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी केली होती. राज्यात हा मुद्दा पेटला असताना अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यावरून आता राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर अजित पवारांना राजकीय डेंग्यू झाला, अशी टीका केली होती. त्यानंतर सत्ताधारी आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही अजित पवारांवर त्यांच्या आजारावरून निशाणा साधला आहे.
अजित पवारांच्या आजाराविषयी बोलताना,”मराठा समाज जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगावर आला, तेव्हा अजित पवारांना डेंग्यू झाला, अशी उपरोधिक टीका रामदास कदम यांनी केली. त्याचबरोबर मराठा आरक्षणावरून सत्ताधारी पक्षातील अजित पवार गटाकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनावरही कदम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सत्ताधारी पक्षातील आमदार सरकारविरोधात आंदोलन कसं काय करू शकतात, हेच मला समजत नाही, असे म्हणत सत्ताधारी नेत्यांवरही रामदास कदम यांनी हल्लाबोल केला.
अजित पवार गटाच्या हेतूंबाबत शंका उपस्थित करताना रामदास कदम म्हणाले, “उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार शरद पवारांचे आशीर्वाद घ्यायला गेले, हे आपण समजू शकतो. पण काल दिलीप वळसे पाटीलही पवारांकडे आशीर्वाद घ्यायला गेले. सुनील तटकरेही आशीर्वाद घ्यायला गेले आणि तिथून ते अमित शाहांना भेटायला दिल्लीत गेले. मराठा समाज जेव्हा एकनाथ शिंदेंच्या अंगावर आला, तेव्हा नेमका अजितदादांना डेंग्यू झाला. अजित पवारांचे २० पैकी २० आमदार एकनाथ शिंदे आणि शासनाच्या विरोधात मंत्रालयात आंदोलन करू लागले. त्यांनी मंत्रालयाचं गेट बंद केलं, हेच मला कळत नाही.” असे म्हणत त्यांनी टीकास्त्र उगारले.