नवी दिल्ली : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील सरकारविषयी मोठे वक्तव्य करत शिवसेनेला भाजपसोबत येण्यासाठी शिवसेनेला पुन्हा एकदा साद घातली आहे. शिवसेनेने आपला निर्णय बदलावा. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करायचे असेल तर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. त्यासाठी भाजप शिवसेना आणि आरपीआय एकत्र असले पाहिजेत असे आठवले यांनी म्हटले.
रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर भर दिला. केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले हे सांगली दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अडीच वर्षाचा जो फॉर्म्युला होता त्यावर पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेचे एकमत व्हायला काही हरकत नाही. अडीच वर्षानंतर मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना द्यावे आणि उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावं असेही रामदास आठवले यांनी म्हटले. अजूनही भाजप आणि शिवसेना यांचे सरकार स्थापन होऊ शकते, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावरून देखील आठवले यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून एसटी कामगारांवर अन्याय होत आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय घेतला आहे. मात्र, एसटी कर्मचारी राज्य शासनामध्ये महामंडळाचे विलीनीकरण करावे या मागणीवर ठाम आहेत. विलीनीकरणाच्या निर्णयासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल हा विलीनीकरणाच्या बाजूने येण्याची शक्यता असल्याचे भाकित आठवले यांनी वर्तवले.
रामदास आठवले यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक विषयावरून वाद आहेत. हा विकास आघाडीमधील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचारा संबंधी आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी चौकशीदेखील सुरू आहेत. त्यामुळे हे सरकार महाराष्ट्राच्या सत्तेत राहणे योग्य नाही, असेही आठवले म्हणाले.
मार्च महिन्यामध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले होते. त्यांच्या या दाव्यावर बोलताना आठवले यांनी आम्हीदेखील सरकार पडणार असल्याची वाट पाहत असल्याची मिश्किल टिप्पणी केली आहे.