दौंड – मंत्रिपदासाठी मी इकडे तिकडे जात नाही. मी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते आणि त्या बदल्यात ते मला मंत्रिपद देतात, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दौंड येथे बोलताना व्यक्त केले. दौंड शहरात होत असलेल्या बुद्ध विहाराच्या भूमिपूजनाप्रसंगी झालेल्या सभेत बोलत होते.
याप्रसंगी भाजपच्या नेत्या कांचन कुल, दौंडच्या नगराध्यक्ष शितल कटरिया यांसह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना रामदास आठवले पुढे म्हणाले की, ईव्हीएम मशीन खराब आहेत, ही चर्चा चुकीची आहे. माझा एकही खासदार नसताना महायुतीने आम्हाला मंत्रिपद दिले आहे. पॅंथरचे नेतृत्व करीत असताना ते नेतृत्व मजबूत करण्यात दौंडचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
आमदार राहुल कुल म्हणाले की, सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत, दौंड तालुक्यात चौदाशे कोटींचा विकास निधी आणला असून, त्याचा कार्य अहवाल लवकरच पोहोच केला जाईल. शहरातील क्रीडा संकुलच्या जागेचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आज मार्गी लागला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
घरासाठी अडीच लाखांचा निधी लाभार्थींना मिळणार
या कार्यक्रमात पीएमआरडीअंतर्गत येणाऱ्या गावातील घरांसाठी अडीच लाखांचा निधी देत येणार असणाऱ्या योजनेच्या लाभार्थीं लाभ मंजूर झाल्याची पत्रे देण्यात आली, तसेच भूमिहिनांनी केलेली अतिक्रमणे नियमित झाल्यामुळे त्या नियमित झालेल्या अतिक्रमणाची पत्रेही यावेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासी आठवले यांच्या हस्ते वाटप करण्यात आली.