जयपुर – राजस्थानात कॉंग्रेसच्या तीन आमदारांनी पक्षाच्या राज्यसभा उमेदवारांच्या निवडीवरून नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे कॉंग्रेसचे टेंशन वाढले होते; पण मुख्यमंत्र्यांनी स्वत या तीन आमदारांशी चर्चा केल्यानंतर त्यांची नाराजी दूर झाल्याचे सांगण्यात येत असून या तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमवेत उदयपूरला जाण्याची तयारी दर्शवली आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या आमदारांना उदयपूर येथील एका हॉटेलात ठेवण्यात आले आहे. तेथे आजच या तीन आमदारांना घेऊन मुख्यमंत्री अशोक गहलोत हे जाणार आहेत. बहुजन समाज पक्षातून कॉंग्रेस मध्ये आलेले सहा आमदारही त्यांच्याच बरोबर तिथे उपस्थित आहेत असेही सांगण्यात येत आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने तीन उमेदवार दिले असून त्यांच्या विजयासाठी कॉंग्रेसला 123 मतांची गरज आहे. कॉंग्रेसचे 108 आमदार असून त्यांना अन्य आमदारांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे कॉंग्रेस कडील आमदारांची संख्या आता 126 झाली आहे असे सांगण्यात येत आहे.