एकदा काय झाले, कृष्णाच्या गावाबाहेरच्या वनात एका महान तपस्वीचे आगमन झाले. ती वार्ता श्रीकृष्णाच्या पत्नींना कळली. त्यांनी विचार केला की आपण आपला अतिथी धर्म पाळून त्या थोर तपस्वीला जेवू घालावे. त्यांनी वेगवेगळे भरपूर पदार्थ तयार करून घेतले आणि त्या निघाल्या. पण प्रचंड पावसाने यमुनेला मोठा पूर आला होता. आता पलीकडे कसे जायचे? त्या स्त्रियांनी आपली अडचण कृष्णास सांगितली.
त्यावर कृष्ण म्हणाला, “”हे बघा तुम्ही असं करा, यमुनेच्या काठावर जा. तिला प्रार्थना करा की, आमचा श्रीकृष्ण हा जर खरंच ब्रह्मचारी असेल तर आम्हास वाट करून दे.”
तीच युक्ती वापरून त्या साऱ्याजणी यमुनेच्या पैलतीरावर गेल्या. त्यांनी त्या तपस्वीस मोठ्या आनंदाने सारे पदार्थ खाऊ घातले. बऱ्याच दिवसांनी असे सुग्रास भोजन मिळाल्याने तोही मनोमन सुखावला. त्याने पोटभर जेवण केले आणि त्या सर्वांना तोंड भरून आशीर्वाद दिले.
आता परत जायचं तर पुन्हा तीच समस्या. काय करायचं, त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने तपस्वीकडे पाहिले. त्यावर तो म्हणाला, “”तुम्ही असे करा, नदीच्या किनाऱ्यावर जा. तिला हात जोडा आणि असं म्हणा की, हा तपस्वी खरंच जर जन्मभराचा उपाशी असेल तर आम्हास वाट करून दे.” त्यांनी तेच केले आणि त्या परत आल्या.
परत येताच कृष्णास विचारले की, आमच्या समोर तो तपस्वी एवढे जेवला तरी तो जन्मभराचा उपाशी हे कसं काय? तेव्हा त्या रहस्याची उकल करीत कृष्णाने खुलासा केला की, तुम्ही दिलेले ते अनेक पदार्थ तो खात होता, पण ते अन्न केवळ पोटात घालायचे ही त्याची देहकृती होती. त्याचं मन हे मात्र त्या अन्नाचा रसास्वाद, गोडी, तृप्ती या सर्वांपासून वेगळं होतं.
ते म्हणत होतं, तोंड घास घेतेय. पोट भरतंय, या दोन्ही देहाच्या क्रिया चालल्या आहेत. पण माझं मन मात्र या सर्वांपासून अलिप्त आहे. त्याच अर्थाने मी जन्मभराचा उपाशी आहे. जे करतंय भोगतंय ते देह, मी नाही. माझा मी या सर्वांपासून वेगळा आहे. त्या मनाच्या साक्षी भावाची ती कबुली आहे की, मी अजूनही जन्मभराचा उपाशीच आहे.