जयपूर – राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सोमवारी राजस्थानमध्ये कॉंग्रेसच्या पाऊलांवर पाऊल टाकले. कॉंग्रेसचे अनुकरण करत भाजपनेही त्या राज्यातील आपल्या आमदारांना एका रिसॉर्टमध्ये हलवले. राजस्थानमधील भाजपच्या 71 पैकी सुमारे 60 आमदारांनी येथील रिसॉर्ट गाठले. काही जण स्वत:च्या वाहनांमधून रिसॉर्टवर पोहचले. तर, अनेक आमदार दोन बसमधून दाखल झाले.
प्रशिक्षण शिबिरासाठी आमदारांना रिसॉर्टवर नेण्यात आल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली. त्या शिबिरात राज्यसभा निवडणुकीविषयीचे प्रशिक्षण भाजपच्या आमदारांना दिले जाणार आहे. राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या 4 जागांसाठी 10 जूनला निवडणूक होणार आहे.
एकूण 5 उमेदवार रिंगणात असल्याने ती निवडणूक चुरशीची बनली आहे. राजस्थानात सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेसने 3 उमेदवार दिले आहेत. भाजपने एक उमेदवार देतानाच अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले माध्यमसम्राट सुभाष चंद्रा यांना पाठिंबा दिला आहे.
प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी किमान 41 मते आवश्यक आहेत. कॉंग्रेसचे 108 आमदार असल्याने त्या पक्षाचे 2 उमेदवार सहज विजय मिळवू शकतात. मात्र, अपक्षांसह 126 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करत कॉंग्रेसने तिसरा उमेदवारही दिला आहे. भाजपकडे एका उमेदवाराच्या विजयानंतर 30 मते अतिरिक्त राहणार आहेत.
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी वर्तवली आहे. त्यातून आपल्या आमदारांची फाटाफूट टाळण्यासाठी त्यांनी रिसॉर्टचे राजकारण अवलंबले आहे. कॉंग्रेसने याआधीच आपल्या बहुतांश आमदारांना आणि पाठिंबा असणाऱ्या अपक्ष आमदारांना उदयपूरमधील रिसॉर्टमध्ये हलवले आहे.