नवी दिल्ली – प्रेषित महंमद यांच्यावर भाजपच्या प्रवक्त्याने आक्षेपार्ह वक्तव्य केले त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया आल्यामुळेच भाजपला आपल्या प्रवक्त्यांवर कारवाई करणे भाग पडले आहे असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.
श्रीमती नुपूर शर्मा आणि नवीन कुमार हे इस्लामोफोबियाचे मूळ निर्माते नव्हते. लक्षात ठेवा, ते राजापेक्षा अधिक निष्ठावान राहण्याचा प्रयत्न करत होते असे चिदंबरम यांनी ट्विटरवर म्हटले आहे.देशांतर्गत टीकेने भाजपला दोन प्रवक्त्यांच्या विरोधात कारवाई करण्यास प्रवृत्त केलेले नाही, केवळ आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांमुळे भाजपला ही कारवाई करण्यास भाग पाडले आहे असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी म्हटले आहे की, काही देशांनी भारताच्या माफीची मागणी केली आहे. पण भाजपच्या प्रवक्त्यांमुळे संपुर्ण देशाला माफी मागण्याची वेळ आली आहे. या लोकांच्या वेडेपणाबद्दल भारताने माफी मागण्याची गरज काय असा सवालही खेरा यांनी व्यक्त केला आहे.