नवी दिल्ली -भाजपच्या २८ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ लवकरच समाप्त होत आहे. त्यातील केवळ चौघांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे, भाजपने ७ केंद्रीय मंत्र्यांनाही राज्यसभा निवडणुकीसाठी पुन्हा उमेदवारी देण्याचे टाळले आहे.
भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि अश्वनी वैष्णव, एल.मुरूगन या दोन केंद्रीय मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
नड्डा वगळता राज्यसभा सदस्य म्हणून दोन किंवा तीन कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या कुठल्याच नेत्याला त्या पक्षाने पुन्हा संधी दिलेली नाही. पुन्हा उमेदवारी मिळाल्याने नड्डा तिसऱ्यांदा राज्यसभा सदस्य बनतील.
नारायण राणे, राजीव चंद्रशेखर, मनसुख मांडवीय, परषोत्तम रूपाला, व्ही.मुरलीधरन, धर्मेंद्र प्रधान आणि भुपेंद्र यादव या केंद्रीय मंत्र्यांनाही राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आलेली नाही. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनाही उमेदवारीने हुलकावणी दिली आहे.
केंद्रीय मंत्र्यांना राज्यसभेवर पाठवण्याऐवजी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची भाजपची रणनीती असल्याचे समजते. त्यातून नव्या चेहऱ्यांना राज्यसभेवर पाठवण्याची राजकीय खेळी भाजपने केली आहे.