कोल्हापूर – महायुतीसोबत तर जाण्याचा प्रश्नच येत नाही पण महाविकास आघाडीसोबतही जाणार नाही. यापूर्वी ज्यांच्यासोबत गेलो त्यांचे अनुभव फारसे चांगले नाहीत. एकंदरीत दोघांचीही भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने नसल्याचे दिसले. आता स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीच स्वतंत्रपणे या निवडणुकीत आपण उतरावे, तुम्हाला शेतकऱ्यांचा पाठिंबा आम्ही मिळवून देऊ, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी घेतली आहे.
दरम्यान शेट्टी पुढे बोलताना म्हणाले की, कोणासोबत स्वाभिमानी ही राजकीय संधान बांधणार नसून, कोणी पाठिंबा दिला तर त्याला नाही म्हणणार नाही, स्वाभिमानीची भूमिका ही ‘एकाला चलो ची’ असेल. संघटना आणि संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर स्वतंत्रपणे ही निवडणूक मी लढवणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपली कोणाशीही आघाडी नसेल. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र लढण्यास सांगितल्याने “एकला चलो’ हीच आपली भूमिका असेल, असे स्पष्ट मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. महायुतीसोबत तर नाहीच नाही पण महाविकास आघाडीसोबतही जाण्याचा प्रश्न येत नाही.
आम्हाला मिश्या फुटल्यापासून साखर कारखानदारांची कर्ज आहेत, असे ऐकत आलो आहे. आता तर यांची कर्ज फिटणार का? एखादा मुद्दा उपस्थित केला की कारखानदार हाच मुद्द्दा पुढे करत आहेत. गेल्या तीस वर्षांपासून आमच्यावर कर्जं आहेत, हेच ऐकत आलो आहे. याना शेतकऱ्यांना पैसे द्यायचा नाही. यांना येणाऱ्या निवडणुकीत शेतकऱ्यांचा पैसा उधळायचा आहे, असेही ते यावेळी बोलताना पुढे म्हणाले.