नवी दिल्ली –समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार कॉंग्रेसवर नाराज असल्याचे समोर आले. सध्या इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीच्या हालचाली ठप्प असल्याकडे नितीश यांनी लक्ष वेधले. त्या स्थितीसाठी त्यांनी कॉंग्रेसला जबाबदार धरले.
बिहारची राजधानी पाटण्यात भाकपची सभा झाली. त्या सभेला जेडीयूचे नेते असणारे नितीशही उपस्थित राहिले. त्यांनी भाषणावेळी विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडियाची स्थापना केल्याचे नमूद केले. मात्र, त्या आघाडीची वाटचाल सध्या थंडावली असल्याची खंत व्यक्त केली. इंडियामध्ये कॉंग्रेसकडे मुख्य भूमिका सोपवण्याविषयी आम्ही सर्व सहमत झालो.
मात्र, त्या पक्षाला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये अधिक रस असल्याचे दिसते. बहुधा, त्या निवडणुका झाल्यावर तो पक्ष इंडियाकडे लक्ष देईल असे वाटते, असे नितीश यांनी म्हटले. त्यांच्याआधी अखिलेश यांनी मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत हातमिळवणी टळल्यानंतर कॉंग्रेसविषयी नाराजी व्यक्त केली होती. आता नितीश यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर इंडियाचे गाडे अजूनही पूर्णपणे रूळांवर आले नसल्याचे स्पष्ट झाले.