हातकणंगले – भारतीय जनता पक्षाच्या विरोधात 2015 पासून आम्ही काम करत आहोत, आम्ही भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही. मात्र, महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार यांना आम्ही आघाडी सोडत असतांना एक पत्र लिहिले होते.
त्याची साधी दखलही आघाडीने घेतली नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडी सोबत देखील निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे राजू शेट्टी यांनी जाहीर केले होते.
मात्र, आता महाविकास आघाडी आपल्याला पाठिंबा देण्यास तयार असेल, तर मी देखील पाठिंबा घेण्यास तयार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. असे असले तरी आम्ही महाविकास आघाडीमध्ये स्वाभिमानी पक्षाचा समावेश करणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढवावी असा प्रयत्न आघाडीच्या वतीने करण्यात आला होता. मात्र, राजू शेट्टी यांनी वेगळी भूमिका घेतली. ते जर वेगळी भूमिका घेणार असतील तर आम्हाला हातकलंगले लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचा उमेदवार द्यावा लागेल, असे म्हणत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
मात्र, त्यानंतर लगेचच राजू शेट्टी यांनी आपण महाविकास आघाडीचा पाठिंबा घेण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, पाठिंबा घेणार असलो म्हणजे आपण महाविकास आघाडीमध्ये सामील झालेलो नाही. आमचा पक्ष महाविकास आघाडीमध्ये येणार नाही. मात्र, आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.
हातकणंगले ठाकरेंच्या वाट्याला
सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने हे खासदार आहेत. ही जागा शिवसेनेकडे असल्याने उद्धव ठाकरे यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.
या संदर्भात राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. धैर्यशील माने यांच्या विरोधात राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरे आता काय निर्णय घेते? हे पाहावे लागणार आहे.