राजगुरूनगर (प्रतिनिधी) – राजगुरुनगर शहरालगत असलेल्या थिगळस्थळ (ता. खेड) येथे राहत्या चार घरांना आग लागल्याने सुमारे 20 लाखांचे नुकसान झाले; सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही दुर्घटना रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली.
राजगुरुनगर नगरपरिषद हद्दीतील शासकीय विश्रामगृहाच्या मागील बाजूस नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीच्या परिसरात थिगळस्थळ येथे ही दुर्घटना घडली. या आगीत दोन राहत्या कुंटुंबांना या फटका बसला आहे. त्यांचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत चार कुटुंबाची पाच लाखांच्या रोख रकमेसह 15 तोळ्यांचे दागिने, धान्य, इलेक्ट्रॉनिक साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स विक्रीचा दुकानातील मालासह वायरिंगचे जवळपास दीड लाखांचे साहित्य जळून खाक झाले झाले. या कुटुंबाची शेती, शैक्षणिक आणि इतर महत्वाची कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
दशरथ सखाराम थिगळे, मारुती पोपट थिगळे यांचा घरप्रंपच जळून खाक झाले. शामराव बाळाराम थिगळे, काशिनाथ थिगळे यांच्या घरातील शेती औजारे, धान्य आणि साहित्य जळुन खाक झाले. रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घरामध्ये शॉटसर्किट होऊन आग लागली असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घराच्या चारही बाजुला आग लागल्याने आजूबाजूला असणाऱ्या घरांनाही झळ बसली. जुन्या पद्धतीचे मंगलोरी कौलारू लाकडी तुळयांचे घर जळून गेले.
राजगुरुनगर नगरपरिषदेच्या अग्निशामक बंब बोलविण्यात आला होता; मात्र आग आटोक्यात आली नाही. घटनास्थळी जाऊन तलाठी बी. के. लंघे, सहायक संतोष उढाणे आणि वीज वितरण कंपनीचे शहर शाखा अभियंता सावंत यांनी पाहणी करुन नुकसानीचा पंचनामा केला. शासनाने जळीतग्रस्तांना मदत करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे यांनी केली आहे.