मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख चढतच जात असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यावर पुन्हा एकदा लॉक डाऊनचे संकट ओढवताना दिसत आहे. त्यातच आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन संबंधी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्वात मोठे विधान केले आहे.
“मला असं वाटतं की, मुख्यमंत्र्यांनाच लॉकडाउनचा अधिकार असतो. महाराष्ट्राच्या आरोग्याच्या हिताचा तसेच इतर परिणामांचा विचार करुन ते आणि इतर वरिष्ठ मंडळी चर्चा करतील आणि ठरवतील. लॉकडाउन हा खरं तर शेवटचाच पर्याय असतो त्यामुळे याबबत सविस्तर चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल,” असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. रम्यान यावेळी त्यांनी मुंबई लोकलसंबंधीही भाष्य केलं. लोकलबाबत कठोर निर्णय घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
ते म्हणाले की, “सुरेश काकाणी यांनी चर्चा करुन पत्र काढलं आहे. ज्यामध्ये त्यांनी लोकांनी योग्य प्रतिसाद दिला नाही तर रेल्वेच्या बाबतीत योग्य ते विचार करावा लागेल असं सांगितलं आहे. त्यामुळे मुंबई पालिका आयुक्त मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य निर्णय घेतील”. याआधी राजेश टोपेंनी राज्यातील काही शहरांमध्ये वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता लॉकडाउन लावणे अटळ असेल तर त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. टोपे म्हणाले, राज्यातील नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांचे गांभीर्याने पालन करावे, अन्यथा लॉकडाउनचा निर्णय घेण्याशिवाय पर्याय नसेल. आणखी दोन ते तीन दिवस पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांतील रुग्णवाढीची दिशा पाहून योग्य ते निर्णय घेतले जातील.
मुंबईत गेल्या आठवड्याभरात मुंबईमधील करोना वाढीचा दर तब्बल ०.६९ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुपटीचा काळ ९७ दिवसांवर घसरला आहे. मुंबईत सोमवारी ३,२६० जणांना करोनाचा संसर्ग झाला असून १० रुग्णांचा मृत्यू झाला.आतापर्यंत तीन लाख ६५ हजार ९१४ मुंबईकरांना करोनाची बाधा झाली आहे तर ११ हजार ५९२ मुंबईकरांचा करोनाने मृत्यू झाला आहे. मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणा ९० टक्क्यांवर घसरले आहे. सोमवारी १,३२३ रुग्ण करोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेले. विविध रुग्णालयांमध्ये २५ हजार ३७२ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. सोमवारी दिवसभरात १९ हजार ३४७ चाचण्या करण्यात आल्या.