जयपूर – राजस्थानमधील कॉंग्रेस सरकारने शनिवारी अग्निपथ योजनेला विरोध दर्शवणारा ठराव मंजूर केला. त्या ठरावाद्वारे योजना मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत अग्निपथविरोधी ठराव मंजूर करण्यात आला. संबंधित योजनेविषयी युवकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्यामुळे देशभरात निदर्शनांचे सत्र सुरू झाले आहे. सैनिक आणि त्यांच्या कुटूंबीयांच्या सुरक्षित भविष्यासाठी नियमित भरतीप्रक्रियेची गरज तज्ञ अधोरेखित करत आहेत.
त्यामुळे कुठलीही योजना आणण्याआधी केंद्र सरकारने सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा करावी, असे त्या ठरावात नमूद करण्यात आले आहे. पंजाब कॉंग्रेसनेही तशा ठरावाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
पंजाबमधील आप सरकारने राज्य विधानसभेत अग्निपथविरोधी ठराव आणावा, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेसने केली आहे. त्यामुळे राजस्थानचे अनुकरण भाजपेतर पक्षांची राज्य सरकारे करण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. तशा प्रकारच्या ठरावांद्वारे केंद्र सरकार आणि भाजपची कोंडी करण्याची संधी इतर पक्षांना मिळणार आहे.