मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनातून त्यांनी एक मोठे विधान केले आहे. “कर्नाटकमधील सरकार मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल, तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही,” असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
राज ठाकरे यांनी जारी केलेल्या निवेदनात, “कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की, मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरू असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरू असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी.” असे आवाहन यावेळी त्यांनी केला आहे.
पुढे निवेदनात राज ठाकरे यांनी,“तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती याचा आदर केलाच पाहिजे, या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही,” असा इशारा दिला.
पुढे त्यांनी, “मध्यंतरी जेव्हा पुन्हा एकदा सीमावादाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा मी म्हणालो होतो की, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत, तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे.” म्हटले आहे.
तसेच “तेव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली, तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत,” असे मत राज ठाकरेंनी व्यक्त केले. “यासाठी सीमाभागातील लोकांना १० मेला संधी आहे. मराठी आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं. हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका,” असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.