Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात टोलचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. मनसेकडून टोलच्या मुद्द्यावरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला त्यानंतर सरकार ऍक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. कारण वाढीव टोल (Toll Plaza Issue) एक महिन्यात रद्द केला जाणार असल्याचे आश्वासन सरकारने (Maharashtra Government) दिल्याचे मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज सांगितले.
राज ठाकरे आणि दादा भुसे यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. यात त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी सरकारसोबत झालेल्या बैठकीतील मुद्द्यांची माहिती दिली. त्यांनी सर्व एंट्री पॉईन्ट्सवर सरकारतर्फे कॅमेरे लागतील. आम्हीही आमचे कॅमेरे लावू ज्यामुळे टोल नाक्यावर किती वाहनं जातात, याची माहिती मिळेल, अशी माहिती दिली. दरम्यान, टोल दरवाढीबाबत राज ठाकरेंच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थान शिवतीर्थवर बैठक झाली. मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासह अधिकारी शिवतीर्थावर बैठकीसाठी उपस्थित होते. राज ठाकरेंच्या मागण्यांवर सकारात्मक असल्याचे स्वतः दादा भुसेंनी यावेळी बोलताना सांगितले.
बैठकीतील महत्वाचे मुद्दे…
दरम्यान, बैठकीत महाराष्ट्रातील टोलसंदर्भात नेमकं काय ठरलंय? याबाबत राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत महत्त्वाचे मुद्दे सविस्तर सांगितले. त्यानुसार…
१. पुढचे १५ दिवस टोलच्या सर्व एंट्री पॉइंट्सवर सरकारकडून कॅमेरे लावले जातील आणि त्यांच्याबरोबर आमचेही पक्षाचे कॅमेरे लागतील. त्यामुळे किती गाड्यांची ये-जा होतेय त्या मोजल्या जातील. हे किती काळ चालू राहणार हे नागरिक म्हणून आपल्याला समजलं पाहिजे.
२. करारात नमूद केलेल्या सर्व सोयीसुविधा, स्वच्छ प्रसाधनगृह, प्रथमोपचारासाठी लागणारी सेवा, एक रुग्णवाहिका , क्रेन, प्रकाशयंत्रणा, पोलीस अंमलदार, फोन, करारपत्र, शासन निर्णय, तक्रार वही या गोष्टी टोलनाक्यांवर असतील. मंत्रालयात यासंदर्भात एक कक्ष काम करेल.
३. करारातील नमूद सर्व उड्डाणपुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल. नामांकित आयआयटीच्या लोकांकडून ते केलं जाईल. सरकारी यंत्रणेकडून ते होणार नाही.
४. ठाण्याला झालेली टोलवाढ रद्द करण्याच्या दृष्टीने सरकारला महिन्याभराचा अवधी पाहिजे. त्यासंदर्भात महिन्याभरात निर्णय घेतला जाईल.
५. प्रत्येक टोलनाक्यावर पिवळी रेषा होती. आता ती व्यवस्था पुन्हा सुरू केली जाईल. २०० ते ३०० मीटरपर्यंत त्या रेषेवर रांग गेली, तर त्यारेषेपुढच्या टोलनाक्यापर्यंतच्या सगळ्या गाड्या टोल न घेता सोडून दिल्या जातील. ४ मिनिटांच्या पुढे टोलनाक्यावर एकही गाडी थांबणार नाही. त्यासाठी तिथे काही पोलीसही थांबतील. टोलवरचे कर्मचारी अरेरावीने वागतात त्यावर वचक बसेल.
६. टोलनाक्यावर जर फास्टटॅग चालला नाही, तर तुम्हाला एकदाच पैसे भरावे लागतील. सध्या तिथे एकदा पैसे घेतात आणि पुढे पुन्हा फास्टटॅगनुसार पैसे कट झाल्याचा मेसेज येतो. तसं झालं तर तुम्हाला तक्रार करता येईल.
७. कितीचं टेंडर आहे, टोलचा आकडा किती आहे, रोजचे वसूल किती होतायत आणि उरले किती हे मोठ्या डिजिटल बोर्डावर दोन्ही बाजूला रोजच्या रोज दाखवलं जाईल.
८. ठाण्याचा आनंदनगर टोलनाका – ठाण्याच्या लोकांना आनंदनगर टोलनाक्यावरून ऐरोलीच्या टोलनाक्यावर जायचं असेल, तर तो टोल एकदाच भरावा लागेल. सध्या दोन्ही टोलनाक्यांवर टोल भरावा लागतो. महिन्याभरात हा निर्णय घेतला जाईल. त्याचं सर्वेक्षण केलं जाईल..
९. सार्वजनिक बांधकाम विभागाचे २९ आणि राज्य रस्ते विकास महामंडळाचे १५ जुने टोल रद्द करण्यासंदर्भात सरकार महिन्याभरात निर्णय सांगेल.
१०. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचं कॅग ऑडिट केलं जाईल.
११. टोलनाक्यांवर अवजड वाहनं कोणत्याही लेनमध्ये येतात. ती सर्व वाहनं महिन्याभराच्या आता योग्य पद्धतीने नियोजन करून टोलवरून सोडली जातील.
१२. टोल प्लाझाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना सवलत मासिक पास उपलब्ध करून दिले जातील.