मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचू नुकतीच भेट घेतली होती. त्यावेळी तेथील मंत्रालयाच्या लिफ्टबाबत एक निरिक्षण नोंदवले आहे. तसेच त्याचा संदर्भ देत महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला एक सल्लाही दिला आहे.
पश्चिम बंगालच्या मंत्रालयाचा दरवाजा उघडला की लगेच तेथे किशोर कुमार यांची बंगालीतील गाणी लागतात. महाराष्ट्रातील मंत्रालयात देखील लता दीदींची, आशा ताईंची, पंडितजींची गाणी लागायला पाहिजे, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमत त्यांनी हा सल्ला दिला आहे.
राज ठाकरे म्हणाले, “खरंतर महाराष्ट्र राज्याने पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या लोकांना उचलून धरलं पाहिजे. सांस्कृतिक गोष्ट काय असते, सांगितीक गोष्ट काय असते? मी मध्यंतरी ममता बॅनर्जी यांना भेटायला पश्चिम बंगालच्या मंत्रालयात गेलो होतो. मी त्या मंत्रालयाच्या वास्तूत गेलो, लिफ्टचा दरवाजा उघडला आणि पश्चिम बंगालच्या मंत्रालयाच्या लिफ्टमध्ये किशोर कुमार यांची बंगालीतील गाणी लागली. जो कोणी माणूस आमच्या मंत्रालयात येईल, तो कोणत्याही भाषेचा असेल त्याच्या कानावर पहिल्यांदा बंगाली भाषा गेली पाहिजे.”
“किशोर कुमार यांच्यासारखी व्यक्ती पश्चिम बंगालमध्ये जन्माला आल्यानंतर पश्चिम बंगाल सरकारने तो निर्णय घेतला. खरंतर महाराष्ट्राच्या मंत्रालयात लिफ्टमध्ये लता दीदींची, आशा ताईंची, पंडितजींची गाणी लागायला पाहिजे. जो येईल त्याच्या कानावर ही गाणी पडली पाहिजे,” असे राज ठाकरे यांनी सांगितले.