मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अनेकांनी रस्ते अपघातात जीव गमावला आहे. असे असताना सुद्धा रस्ते अपघाताच्या मालिका सुरुच आहेत. मुंबईत एका भरधाव ट्रकने कुटुंबाला चिरडले आहे. या अपघातात दुर्दैवाने बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आई आणि मोठी मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबई-दहिसर महामार्गावर घडला आहे.
मूळचे पंजाबचे असलेले हे गुप्ता कुटुंब मुंबई येथे परत येत असतानाच हा अपघात झाला आहे. मुंबई दहिसर रस्त्यावरून जात असताना एका भरधाव ट्रकने संपूर्ण कुटुंबालाच उडवले आहे. जखमी आई व मोठ्या मुलीवर मुंबईतील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. मात्र त्यांची प्रकृती गंभीर आहे.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली व आरोपी ट्रकचालकाला अटक केली. घटनास्थळी नागरीकांनी एकच गर्दी केली होती. यामुळे काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती. पुढील तपास पोलीस करत आहेत.