मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी बैठक संपन्न
मुंबई – विधानसभा निवडणूक लढवाची की नाही यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये दुमत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेने 2019 मधली लोकसभा निवडणूकही लढवली नव्हती. मात्र विधानसभा निवडणुकीत मनसे काय करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी एक बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणूक लढवायची की नाही यावर चर्चा झाली. मात्र निर्णय काय झाला ते जाहीर करण्यात आलेले नाही. योग्य वेळी राज ठाकरे निर्णय जाहीर करतील, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठकीत निवडणूक लढवायची की नाही याबाबत नेत्यांची मतं जाणून घेतली. काही नेत्यांनी निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली आहे. तर काहींनी नाही, मात्र आता नेमके काय होणार, पुढे काय भूमिका जाहीर करायची याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाहीर करतील, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
लोकसभा निवडणूक न लढवता मनसेने मोदी विरोधी प्रचार केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी आणि अमित शहा यांना हटवा, असे आवाहन करत 10 सभा घेतल्या होत्या. “लाव रे तो’ व्हिडीओ हे सांगणाऱ्या त्यांच्या सभाही खास गाजल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात या सभांचा काहीही परिणाम झाला नाही हे लोकसभा निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक निकालाबाबत “अनाकलनीय’ अशी एका शब्दाची प्रतिक्रियाही दिली. आता विधानसभा निवडणूक मनसे लढवणार की नाही याबाबत मनसेच्या नेत्यांमध्ये दुमत असल्याचे समजते आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधातही आवाज उठवला. सगळ्या विरोधकांची मोटही राज ठाकरे यांनी बांधली. मात्र राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार की नाही? हा प्रश्न कायम आहे. निवडणूक लढवली पाहिजे अशी भूमिका काही नेत्यांनी घेतली आहे. जेणेकरुन कार्यकर्त्यांमध्ये एक सकारात्मक संदेश जाईल, असे काही नेत्यांनी म्हटले आहे. तर काहींनी निवडणूक लढवू नये अशी भूमिका घेतली आहे. आता याबाबतचा अंतिम निर्णय राज ठाकरेच घेतील, ते निर्णय घेतल्यावर जाहीर करतील असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे.