नाव दिल्ली – देशात सध्या पावसाने हाहाकार घातला आहे. विशेषतः उत्तर भारतात पावसाचा तांडव पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू-काश्मीर, पंजाबसह उत्तरेकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने याठिकाणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे.
पावसामुळे याठिकाणची संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे. अनेक ठिकाणच्या रस्त्यांचे रूपांतर नद्यांमध्ये झाले आहे. पावसामुळे विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे, दरडी कोसळल्यामुळे त्यासोबतच नद्यांना आलेल्या पुरामुळे आतापर्यंत जवळपास अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले असून, काही जण तर बेपत्ता देखील झाले आहेत.
दरम्यान, सतत कोसळणार्या पावसामुळे आता केदारनाथ यात्रा देखील स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने सोनप्रयाग आणि गौरीकुंडमध्ये ही यात्रा स्थगित केली आहे. मंदाकिनी आणि अलकनंदा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे सर्वत्र पूर स्थिती निर्माण झाली. देशातील कानाकोपऱ्यातून अनेक भाविक दरवर्षी हे केदारनाथ यात्रेला जात असतात.
अश्यातच, महाराष्ट्रातील नगर जिल्हयातील वाळकी येथील मनोज भालसिंग व त्यांचे सहकारी उत्तराखंड मधील केदारनाथ यात्रेला 9 तारखेला निघाले होते. मात्र, वाटेत त्यांना खराब हवामानाचा सामना करावा लागला. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या म्हणून दरड कोसळणे आणि पूर या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत होता. यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांसह यात्रेकरू देखील गंभीर जखमी झाले होते.
मात्र, नगर जिल्हयातील या तरुणांनी मध्यरात्री स्वतःच्या जीवाची परवा न करता कोसळलेली दरड आणि मोठे दगड बाजूला सरकून नऊ तासानंतर रस्ता मोकळा करून दिला. त्यानंतर तेथील वाहतूक सुरळीत झाली. सध्या त्यांच्या या मदतकार्याचे चांगलेच कौतुक होताना दिसत आहे. उत्तराखंड येथील स्थानिक पोलीस प्रशासन व शासकीय अधिकाऱ्यांनी देखील मनोज भालसिंग व त्यांचे सहकारी दीपक बोठे, गणेश बोठे, राजेंद्र आव्हाड यांचे आभार मानले आहेत.