गल्लीपासून दिल्ली पर्यंत आपल्या महारष्ट्राचा झेंडा फडकावणारे, रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, कधीही कुठल्याही पिंजऱ्यामध्ये बांधील न राहणारे, अवघ्या महारष्ट्राचे सरपंच म्हणजे निळू फुले. निळकंठ कृष्णाजी फुले म्हणजे निळू फुले हे मूळचे पुण्याचे… वडिलांचा लोखंड तसेच भाजी विकण्याचा व्यवसाय.. त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची म्हणून त्यांना मॅट्रिक पर्यंतच शिक्षण घेता आले. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी ते पुण्यात एका मेडिकल कॉलेज वर त्यांनी केवळ ८० रुपये वेतनावर माळी काम केले. ११ वर्ष त्यांनी तिथे काम केले. नोकरी सांभाळत ते राष्ट्र सेवादलासाठी सुद्धा काम करायचे ..
इ.स. १९५७ च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी त्यांनी समाज प्रबोधन करणारे वगनाट्य लिहले आणि यातूनच त्यांना अभिनयाची दिशा सापडली.. राम नगरकर यांच्याबरोबर ‘कथा अकलेच्या कांद्याची’ हे त्यांचं रंगभूमीवरील पहिले नाटक. या नाटकाचे त्यांचे दोन हजारहुन अधिक प्रयोग झाले. त्यानंतर मात्र त्यांनी कधीही मागे वळून पहिले नाही. विजय तेंडुलकर यांच्या नाटकातील सखाराम बाईंडर असो किंवा मग दळवींच्या सूर्यास्त मधील अप्पाजी, निळू भाऊंनी ह्या सर्व भूमिका हुबेहुब साकारल्या. सूर्यास्त ह्या नाटकासाठी त्यांना ‘ज्ञानदर्पण’ या पुरस्कारानं सन्मानित सुद्धा कारण्यात आलं.
अनंत माने यांच्या ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटामध्ये त्यांनी पहिल्यादा काम केले. हा त्यांचा पहिला चित्रपट.. हा चित्रपट तमाशावर आधारित होता. विजय तेंडुलकरांचा ‘सामना’ ह्या चित्रपटापासून भाऊंना एक वेगळी ओळख मिळाली. हिंदूराव धोंडे पाटील ही त्यांची खलनायकी भुमीका अत्यंत प्रसिद्द झाली. यात ते श्रीराम लागू यांच्याबरोबर विरोधी भूमिकेत दिसून आले. श्रीराम लागूंसारख्या नटसम्राटासमोर झळकेल का? अशी त्यांना शंका होती. पण निळू भाऊंनी मात्र खलनायिकेच्या भूमिकेला तितकीच दाद दिली. त्यानंतर ते अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसून आले. त्यांचा शहरी, ग्रामीण अभ्यास खूप चांगला होता. पिळदार मिशी, डोक्यावर टोपी, करडा आवाज, तिरपी नजर, तोंडात पान अश्या वेशात ते खलनायक म्हणून रुबाबदार दिसायचे.
खऱ्या आयुष्यात साध्या सरळ असणाऱ्या या जिगरबाज हरहुन्नरी कलाकारास मात्र नेहमीच स्त्री रोषाला सामोरे जावे लागले. ते ज्या गावात ज्या कार्यक्रमाला जायचे त्या ठिकाणी महिला त्यांना शिव्यांची लाखोळी वाहायच्या. ‘गावात नवीन पाखरू आलं जणू’, ‘बाई वाड्यावर या’ यांसारख्या अनेक डायलाॅगमुळे निळू भाऊ हे अख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. बऱ्याच चित्रपटांमधून खलनायकाच्या भूमिका साकारल्यानंतर या भूमिकांना छेद देणारी एक भूमिका त्यांनी साकारली ‘सिहासन’ या चित्रपटामध्ये.. पत्रकाराची भूमिका अगदी त्यांनी उत्तम वठवली. या चित्रपटामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या भूमिका होत्या; पण त्यांनी वेगळी भूमिका साकारायचे ठरवले आणि ती भूमिका त्यांनी उत्तम निभावली सुद्धा.
अवघ्या महाराष्ट्राचे लाडके पाटील झालेल्या निळू भाऊंनी ‘आयत्या बिळात नागोबा’, ‘चोरीचा मामला’, ‘पिंजरा’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘गल्ली ते दिल्ली’, ‘चटक चांदणी यांसारख्या चाळीसहुन अधिक चित्रपटांमध्ये कामं केली. मराठी बरोबरच हिंदी चित्रपटांमध्येसुद्धा त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. ‘मुट्टीभर चावल’ या चित्रपटामध्ये ते एका लहानश्या भूमिकेत दिसून आले. त्यांनतर त्यांनी ‘मशाल’, ‘सारांश’, ‘जरासी जिंदगी’, अश्या बाराहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय साकारला. अभिताभ बच्चन यांच्या सोबत ‘कुली’ ह्या चित्रपटामध्ये सुद्धा दिसून आले. ते एक प्रतिभावंत कलाकार तर होतेच त्याचबरोबर ते एक उत्तम समाज सेवक देखील होते. ‘अंधश्रद्धा निर्मूलन’, ‘जातीवाद निर्मूलन’ अश्या विषयांवर समाज प्रबोधनपर नाटक करायचे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम यातही ते सहभागी झाले होते. या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील दिले गेले. साहित्य संगीत अकादमीचा सलग तीन वर्ष पुरस्कार त्यांना देण्यात आला. तर जयंतराव नाट्य गौरव पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. ‘छोटी गोष्ट डोंगरा एवढी’ हा त्याचा शेवटचा चित्रपट या चित्रपटानंतर अन्न नलिकेच्या कर्क रोगाने ते बरेच दिवस त्रस्त होते. १३ जुलै २००९ साली अश्या ह्या दिग्गज कलाकारचे निधन झाले. ते जरी गेले असले तरी त्यांच्या अभिनयाने आणि त्याच्या डायलॉगमुळे ते नेहमी अजरामर आहेत.