450 मिलीमीटर पाऊस : शेतकरी सुखावला
भिगवण- यंदा मान्सून वेळेत सुरु झाला होता. पहिल्या दोन महिन्यांत पावसाने सातत्य राखल्याने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. ठराविक अंतराने सातत्यपूर्ण पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. भिगवण येथील महाराष्ट्र बॅंकेच्या सुजला माती परीक्षण केंद्राद्वारे आजअखेर 450.60 मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
भिगवण परिसर हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. येथील पावसाची वार्षिक सरासरी 400 ते 450 मिमी इतकी आहे. येथील परिसरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांपर्यंत केवळ 86 मिलीमीटर पाऊस झाला होता.
आक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आत्ताच्या इतका म्हणजे 450 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता. अद्याप पावसाळ्याचे दोन महिने बाकी असताना पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. यावर्षी शेतीचा खरीप हंगाम बहरला असून मका, बाजरी, सोयाबीन व भूईमुग आदी पिके जोमात आहेत. उजनी धरण पाणी फुगवट्यालगतच्या शेती क्षेत्रात आडसाली उसाच्या लागवडी मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. टाळेबंदी असली तरी शेतात कामांची लगबग दिसून येत आहे. खरीपाच्या पिकांची खुरपणी, खते, फवारणी आदी कामे सुरू आहेत.
दरम्यान, 2018 मध्ये 302 मिमी तर 2019 मध्ये 526 मिमी पाऊस झाला होता. 2019 मध्ये संपूर्ण मौसमात अल्प पाऊस झाला होता. मात्र, पाऊसकाळ संपल्यानंतर अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले होते. यावर्षी दोनच महिन्यातच सरासरी ओलांडली आहे. पिकांना योग्य प्रमाणात पाऊस झाल्याने शेती बहरली आहे. दोन महिने शेतीसाठी पाणीसंकटाचे ठरतात. पण यावर्षी पाणीदार स्थिती आहे.