सातारा – जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी असलेल्या गोडोली येथील पोलीस वसाहतीत जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली आहे. आठवड्यातून दोन तरी अपघात होत आहेत. मात्र, बांधकाम विभागाला काहीच पडले नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या फंडातून निधी आल्यानंतरही बांधकाम विभागाला टेंडर प्रक्रिया वेळेत करता आली नव्हती. त्यानंतर “प्रभात’ने आवाज उठवल्यावर खडबडून जागे झालेल्या बांधकाम विभागाने त्या रस्त्यावर खडी टाकली मात्र, पावसाने सुरूवात केल्याने काम रखडले होते. आता पाऊस उघडून आठवडा उलटला तरी बांधकाम विभागाचे डोळे उघडले नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्यात तीव्र संताप आहे.
गेली अनेक वर्षे खड्ड्यात असणाऱ्या या रस्त्याच्या कामाला दि.20 जुलै रोजी “प्रभात’ने “”पोलिसांचा रस्ता अडकलाय बांधकामच्या टेबलवर” या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केल्यानंतर काही अंशी दुरूस्तीला सुरूवात झाली. मात्र, अचानक पावासाचा जोर वाढल्याने ते काम थांबवावे लागले होते. त्यानंतर आता पाऊस बंद झाला त्याला आठवडा उलटला तरी बांधकाम विभागाला जाग येत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक माधव सानप यांच्या पाठपुराव्यानंतर 1992 मध्ये जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना 30 इमारतीत दोनशे चाळीस खोल्या असलेली पोलीस वसाहत बांधली गेली. त्यानंतर कमी अधिक प्रमाणात बाकीच्या सुविधा पुरवण्यात आल्या मात्र, त्यानंतर या वसाहतीकडे दुर्लक्ष झाल्यानेच आज त्याठिकाणी राहणाऱ्या पोलिसांना व त्यांच्या कुटुंबातील लोकांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.
जिल्हाभर बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांना ड्युटीचा ताण कमी असतो म्हणून की काय आलेल्या पैशाचे नियोजन न करता बांधकाम विभाग त्यांच्या जिवाशी खेळ करत असल्याचा आरोप केला जात आहे. एकीकडे राज्यात कुठेही खड्डा दिसणार नाही असे राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील सांगत असताना दुसरीकडे मंत्र्याच्याच घोषणेला बांधकाम विभाग कसा खो घालत आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे साताऱ्यातील पोलीस वसाहतीचा रस्ता. रस्त्यात खड्डे असणे एकवेळ समजून घेण्यासारखे आहे. मात्र, खड्ड्यांचाच रस्ता असणे म्हणजे त्या रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या जिवाशी खेळ करण्यासारखे आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गोडोली पोलीस वसाहतीच्या रस्त्यावर आम्ही यापुर्वीच खड्डे भरून घेतले आहेत. मात्र, डांबरीकरणाला सुरूवात करण्यावेळी पावसाने सुरूवात केल्याने काम थांबले होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसात सात नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता असल्याने त्यानंतर पावसाने उघडीप दिल्यास लगेच डांबरीकरणाला सुरूवात करू
आर. के. जाधव अभियंता – बांधकाम विभाग, सातारा.