नवी दिल्ली : देशाच्या विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विशेषत: उत्तर भारतात पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये 9 जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर काही ठिकाणी पूर आणि भूस्खलनाचा इशारा देण्यात आला असून, त्यामुळे अमरनाथ यात्रेच्या मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जम्मू विभागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर या कालावधीत काश्मीर विभागात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेतही व्यत्यय येण्याची शक्यता आहे. नद्यांसह स्थानिक नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अचानक पूर येऊ शकतो, पाणी साचू शकते. अतिसंवेदनशील ठिकाणी दरड कोसळणे, खडक कोसळणण्याचा धोकाही असू शकतो.
उत्तर प्रदेशात गेल्या अनेक दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळं वाढत्या उष्णतेपासून लोकांना दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांना मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेकांसाठी हा मोसमी पाऊस अडचणीचा ठरला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील दोन-तीन दिवसांत पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून इतर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हरियाणा आणि पंजाबमध्ये मान्सूनने आता वेग पकडला आहे. पंजाबमधील 12 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. लुधियानामध्ये पावसाने 50 वर्षांचा विक्रम मोडला आहे. त्याचबरोबर पावसामुळे अनेक शहरांमध्ये पाणी तुंबले आहे. दुसरीकडे, हरियाणातील 18 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला, ज्यामध्ये कैथलमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. मान्सूनच्या पावसामुळे पंजाबच्या तापमानात 8 अंश सेल्सिअसची घसरण झाली आहे.