ढेबेवाडी – यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदा पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. रविवारी दिवसभरात परतीच्या पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने ढेबेवाडी भागात सर्वत्र दाणादाण उडाली. या पावसामुळे ओढे, नदी, नाल्यांना पहिल्यांदाच पूर आले असून शेती, पाणी पुरवठ्याचे पंप पाण्यात बुडाल्याचे दिसून आले.
या पावसात वांग नदीवरील मंद्रुळकोळे व खळे येथील पुल पाण्याखाली गेल्याने सायंकाळी पुलावरील रहदारी ठप्प झाली होती. काळगावच्या ओढ्याला आलेल्या पुरात लोटळेवाडी व बौद्ध वसाहतीकडे जाणारा फरशीपूल पाण्याखाली गेला होता. तसेच सणबूर-रूवले रस्त्यावरील सणबूर-सुतारवाडी येथील ओघळीवरील फरशीपुलावरूनही पाणी गेले होते.
दरवर्षी साधारण मे महिन्याच्या शेवटच्या वा जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. पण, यंदा मात्र मान्सूनने अधेमधे रिमझिम सरी कोसळल्याने खरिप हंगामाच्या पेरण्या झाल्या. पण, उगवण झालेली पिके जगणार का? तसेच अशीच परिस्थिती राहिल्यास दुष्काळी स्थिती ओढवणार का? अशी स्थिती निर्माण झाली होती.
गेल्या 4 महिन्यात मान्सूनने पुर्ण हुलकावणी दिल्याने खरिप हंगाम गेल्यातच जमा आहे. सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, भात पिकांचे उत्पादन पुर्णपणे घटले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावत यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा भागातील मुसळधार पाऊस झाल्याने सर्व ओढे, नदी, नाले दुथडी वाहू लागले असून सगळीकडे दाणादाण उडाली आहे.वांग नदीला आलेल्या पुरात मंद्रुळकोळे व खळे येथील पुल पाण्याखाली गेले असून खळे पुलाला यंदा नव्याने घातलेले पाईपचे संरक्षक कठडे तुटून वाहून गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली.
दरम्यान, मंद्रुळकोळे पुल कोणत्याही क्षणी तुटण्या इतपत धोकादायक बनला असतानाही या पुलावरून रहदारी सुरू होती. आजच्या पावसात हा पुल पाण्याखाली गे ल्याने रहदारी बंद झाली. सणबूरवरून वाल्मिकी पठारावर जाणाऱ्या रस्त्यावर अनेक कमी उंचीचे फरशीपुलही पाण्याखाली गेले होते. दरम्यान, ढेबेवाडी भागात सगळ्यात उंच समजल्या जाणाऱ्या मालदन पुलाच्या स्लॅंबला पाणी लागले असून रात्री पावसाचा जोर वाढल्यास मालदन पुल पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.