Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. त्यात पक्षाचे ज्येष्ठ आणि शरद पवार यांचे विश्वासू नेतेच फुटल्याने राज्यातील राजकारण वेगळ्या वळणावर गेल्याचे दिसून येत आहे. त्यातच अजित पवार गटात सहभागी झालेल्या प्रफुल्ल पटेल यांच्यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निशाण झाला आहे.
सुप्रिया सुळे नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी,”राष्ट्रवादी काँग्रेसला प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे यश मिळालं आहे. माझ्यामुळे पक्षाला अपयश येत असेल, तर मी स्वीकारते. यालाच नेतृत्व म्हणतात. प्रफुल्ल पटेल यांची पक्षात कशामुळे घुसमट होत होती, माहिती नाही, असे विधान सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले आहे.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी, “प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांना २५ वर्षांपासून नेते मानलं आहे. त्यामुळे पटेल यांची पक्षात कशामुळे घुसमट होत होती, माहिती नाही. पटेल यांची खदखद आमच्या कानापर्यंत कधी आली नाही. प्रफुल्ल पटेल आठवड्यातून तीन वेळा शरद पवार यांना भेटायचे. सहा जनपथ हे जेवढं माझं तेवढंच प्रफुल्ल पटेल यांचंही घर होतं.”असे म्हटले.
त्यासोबतच “दिल्लीमधील अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात कार्य करत आहे. यामुळे मराठी माणसाचे खूप मोठं नुकसान हा अदृश्य हात करीत आहे,” असा आरोप देखील यावेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे.
दरम्यान, “पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी परिवारवादाचा विरोध करतात. पण, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी स्वबळावर स्थापन केलेल्या दोन पक्षांना तोडण्याचे काम भाजपानं केलं आहे. ठाकरे आणि पवार यांनी शून्यातून पक्षनिर्मिती केली. दोन्ही पक्षांना तोडून भाजापनं महाराष्ट्राचं नुकसान केलं आहे,” असे सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी सांगितले.