नवी दिल्ली : उत्तर भारतात पावसाचा धुमाकूळ गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहे. दरम्यान, या पावसामुळे आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. भूस्खलन आणि इतर पावसातील दुर्घटनांमुळे हे सर्व मृत्यू झाले आहेत. पावसाचा हिमाचल प्रदेशला सर्वाधिक फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांना सध्या रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेशला मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे या ठिकाणी १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पंजाब आणि हरयाणामध्ये आतापर्यंत ९ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्याचबरोबर राजस्थानात ७ जणांचा आणि उत्तर प्रदेशात ३ जणांचा पावसाच्या विविध दुर्घटनांमध्ये मृत्यू झाला आहे.
VIDEO | Three killed as several vehicles get buried under debris from rain-triggered landslide on Gangotri National Highway in Uttarakhand's Uttarkashi. pic.twitter.com/tx36sF0yGy
— Press Trust of India (@PTI_News) July 11, 2023
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील अनेक नद्या ज्यामध्ये दिल्लीतील यमुना नदीला पूर आला असून ती धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. त्याचबरोबर अनेक शहरांमधील रस्ते आणि रहिवासी सोसायट्यांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. रविवारी या भागांमध्ये रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, पुरस्थितीमुळे ३९ एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. यांपैकी १४ टीम पंजाबमध्ये, १२ टीम हिमाचल प्रदेशात तर ८ टीम उत्तराखंड आणि ५ टीम हरयाणात तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच जम्मूमध्ये अमरनाथ यात्रेसाठी गेलेले सुमारे ७००० भाविक भगवतीनगर बेस कँपमध्ये अडकून पडले आहेत. तर ५००० हून अधिक भाविक चांदरकोट बेस इथे अडकून पडले आहेत. अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.