मुंबई – ‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’च्या वतीने देण्यात येणारा “लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे पुरस्कारचे स्वरूप आहे. लोकमान्य टिळक यांच्या एक ऑगस्ट रोजी असलेल्या पुण्यतिथीदिनी हा पुरस्कार ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. ट्रस्टचे विश्वस्त रोहित टिळक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची माहिती दिली. यावरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, “नरेंद्र मोदी साहेबांना आणि भाजपच्या प्रमुख लोकांना लोकमान्य टिळकांचं चरित्र वाचले पाहिजे. लोकमान्य टिळकांचा संघर्ष, लोकमान्य टिळकांची लोकशाही संदर्भातील भूमिका, ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा सर्वांनी समजून घेतला पाहिजे. हा लढा पुरस्कार देणाऱ्यांनीही आणि घेणाऱ्यांनीही समजून घेतला पाहिजे”, असं संजय राऊत म्हणाले. विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सध्या राज्यात बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या दोघांचे एकत्र येणे हा औत्सुक्याचा विषय आहे.
तर दूसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या सभेत फडणवीस यांच्या भाषणाची एक क्लिप ऐकवली आणि त्यांचा उल्लेख ‘नागपूरचा कलंक’ असा केला. या टीकेचा पलटवार करत देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप ट्वीट केली आणि आठ मुद्द्यांमध्ये त्यांना उत्तर दिलं आहे. यानंतर संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. “महाराष्ट्राचे संपुर्ण सरकारच कलंकित आहे. PMLA कायद्यानुसार आरोपी कडील कलंकित धन दुसऱ्याच्या खात्यावर गेले की तो सुध्दा गुन्हेगार ठरतो. राष्ट्रवादी तसेच शिवसेनेकडील सर्व कलंकित खाती खातेदारांसह भाजप सरकारमध्ये सामील झाली. मनी लॉन्ड्रिंगचे हे सरळ प्रकरण आहे. ED ने संपुर्ण सरकारवरच PMLA नुसार कारवाई करायला हवी. महाराष्ट्र इतका कलंकित कधीच झाला नव्हता,” असे त्यांनी ट्वीट करत म्हंटले आहे.