नवी दिल्ली – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे ‘चांद्रयान’ यशस्वीपणे चंद्रावर उतरले, पण कॉंग्रेसचे ‘राहुलयान’ ना प्रक्षेपित झाले आणि ना त्याचे सुखरुप लॅंडींग झाले, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राहूल गांधींवर टीका केली. कॉंग्रेस पक्ष ज्या “इंडिया’ आघाडीचा सदस्य आहे, ती आघाडी म्हणजे नाव मोठं लक्षण खोटं, असा प्रकार असल्याचंही राजनाथ यांनी म्हटलं आहे.
भाजपच्या परिवर्तन यात्रेचा तिसरा टप्पा सुरू करताना जैसलमेर, रामदेवरा आणि पोखरण येथे पोहोचलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी, कॉंग्रेस पक्ष आणि विरोधी आघाडीवर शाब्दिक तोफ डागली. तसेच तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांच्या सनातन धर्म संपुष्टात आणण्याच्या वक्तव्याबद्दल विरोधी पक्षांनी माफी मागावी, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.
राजनाथ सिंह म्हणाले की, आमच्या सरकारने सर्वसामान्यांना सक्षम करण्याचे काम केले आहे. गरिबांचे कल्याण ही आमची घोषणा नसून आमचे ध्येय आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलनुसार, राजस्थान भ्रष्टाचाराच्या बाबतीत नंबर-1 वर पोहोचला आहे. गेहलोत यांच्या कॉंग्रेस सरकारने राजस्थानची ही अवस्था केली आहे.
राजनाथ सिंह म्हणाले की, राजस्थानमध्ये कॉंग्रेस हिंदू-मुस्लिम आणि मागासवर्गीयांच्या नावावर पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु त्यांच्या आघाडीतील एका पक्षाच्या प्रतिनिधीने सनातन धर्माबद्दल टिप्पणी केली. आता या विरोधी आघाडीचा पराभव निश्चित आहे. द्रमुकने सनातन धर्म दुखावला असून त्यावर कॉंग्रेस गप्प का आहे? कॉंग्रेसचे नेते सनातन धर्माबाबत त्यांचे विचार का सांगत नाहीत? मी विरोधी आघाडीतील लोकांना सांगू इच्छितो की, सनातन धर्माचा अपमान केल्याबद्दल त्यांनी माफी मागावी. अन्यथा हा देश त्यांना कोणत्याही परिस्थितीत माफ करणार नाही,.