मुलतान :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र, सलामीच्या लढतीपासून पाकिस्तानचा संघ वगळता स्पर्धेतील अन्य पाचही सहभागी संघांच्या जर्सीवरून पाकिस्तानचेच नाव गायब झाले आहे. यावरून आता पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आशिया क्रिकेट समितीकडे (एसीसी) तक्रार केली आहे.
यंदाच्या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र, ही स्पर्धा यावेळी हायब्रीड पद्धतीने श्रीलंकेतही होत असून त्यामुळेच ज्या संघांचे सामने पाकिस्तानमध्ये होणार नाही त्यांनी जर्सीवरून नाव हटवणे योग्य असल्याचेही चाहत्यांनी म्हटले आहे. मात्र, केवळ राजकीय तणावांमुळे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये एकही सामना खेळणार नसून त्यांच्या जर्सीवर पहिल्यापासूनच पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा लोगो नव्हता.
मात्र, सलामीच्या लढतीत नेपाळने तसेच श्रीलंका, अफगाणीस्तान व बांगलादेश संघांनीही आपल्या जर्सीवरून पाकचे नाव वगळले आहे. केवळ आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचा लोगो व आशिया क्रिकेट समितीचा लोगो वापरण्यात आला आहे.
मुलतानमध्ये पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात खेळल्या गेलेल्या सलामीच्या सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफनेही पाकिस्तान क्रिकेट मंडळावर टीका केली आहे. स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने केले जात असले तरी अधिकृत यजमान पाकिस्तानच आहे. या मागे काय कारण आहे ते आशिया क्रिकेट समितीला स्पष्ट करावे लागेल. भविष्यातील स्पर्धांमध्ये यजमान देशाचे नाव आशिया चषकाच्या लोगोसोबत दिले जाणार नाही, अशी आशिया क्रिकेट समीतीीच भूमीका आहे का, असा सवालही त्याने केला आहे.
एसीसीने असा निर्णय घेतला असेल, तर 15 वर्षांनंतर पाकिस्तान मोठ्या स्पर्धेचे आयोजन करत असताना पाक मंडळाने तरी हे का मान्य केले. एसीसीने जुलैमध्ये मलेशियामध्ये झालेल्या आशियाई इमर्जिंग नेशन्स कप किंवा आशियाई अंडर-16 स्पर्धेच्या लोगोवर यजमान देशाचे नाव का दिले, असा सवाल पाकिस्तानचा माजी कसोटीपटू मोहसीन खानने उपस्थित केला.
बीसीसीआयवरच ताशेरे…
एसीसीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा असून त्यांनीच पाकिस्तानचा लोगो सर्व संघांच्या जर्सीवर लावण्यास मनाई केली असेल, असेही मोहसीन खानने म्हटले आहे. दोन्ही देशांमधील सध्याची परिस्थिती पाहता बीसीसीआयनेच भारतीय संघाच्या जर्सीवरील पाकचे नाव हटवले असावे, असेही त्यांनी म्हटले आहे.