नवी दिल्ली – भारतीय संघ येत्या रविवारपासून वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यापूर्वीच भारतीय संघाला धक्का बसला असून पहिल्या सामन्यात सलामीवीर लोकेश राहुल खेळणार नसल्याचे सांगितले जात आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर त्याला विश्रांती मिळाल्याचे सांगितले जात आहे. या मालिकेसाठी अहमदाबादला दाखल झाल्यावर संघातील तीन कएळाडूंसह चार सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यावर राहुलला विश्रांती देण्याचा निर्णय मागे घेतला जाणार होता. मात्र, त्याच्या बहिणीचा विवाह असल्याने त्याला पहिल्या सामन्यात सहभागी होता येणार नसल्याचे सांगितले जात आहे.
शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर यांना करोना झाल्याने नियमित कर्णधार रोहित शर्मा याला इशान किशनसह डावाची सुरुवात करावी लागणार आहे. 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापासून तो उपलब्ध असेल. बहिणीच्या विवाहानंतर तो 6 तारखेला संघात दाखल होईल आणि 3 दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करेल.
मालिकेपूर्वीच भारतीय संघाला फटका
मालिकच्या सुरुवात होण्यापूर्वीच यजमान भारताला खेळाडूंना करोनाची बाधा झाल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. संघात रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि दीपक हुडा असे केवळ पाच फलंदाज आहेत. करोनाबाधित तीन खेळाडूंच्या जागी अन्य राखिव खेळाडूंच्या बरोबरीने सलामीवीर मयंक आग्रवालचा संघात समावेश करण्यात आला आहे. तो अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. मात्र, तीन दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण करण्याचा नियम असल्याने त्यालाही पहिल्या सामन्यात खेळता येणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.