अँटिंग्वा – आयसीसीच्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज (शनिवार) भारत व इंग्लंड यांच्यात अंतिम लढत होणार आहे. स्पर्धेच्या इतिहासात सलग चारवेळा अंतिम फेरी गाठलेल्या भारतीय संघाचेच पारडे याही सामन्यात जड राहणार आहे.
या स्पर्धेत भारतीय संघाची वाटचाल लक्षवेधी ठरली आहे. पहिल्या सामन्यापासूनच भारतीय संघाने प्रत्येक संघावर वर्चस्व राखले आहे. भारतीय संघ फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि सर्वात महत्वेचे म्हणजे नेतृत्व या सर्वच क्षेत्रात बलाढ्य दिसला आहे. संघातील प्रमुख खेळाडूंना करोनाची बाधा झाल्यावरही सेकंड बेंचने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. आता नियमित कर्णधार यश धुलसह सर्व करोनाबाधित प्रमुख खेळाडू उपांत्य लढतीपासून संघात परतले व संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभूत करत थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला.
– भारतीय संघाचा सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश
– स्पर्धेच्या इतिहासात पाचव्यांदा अंतिम फेरीत
– गेल्या वर्षी बांगलादेशकडून पराभव
– यंदा विक्रमी पाचव्या विजेतेपदाची संधी
– इंग्लंड 24 वर्षांनंतर अंतिम फेरीत
दुसरीकडे इंग्लंडने अफगाणिस्तानचा उपांत्य फेरीत पराभव केला असला तरीही या स्पर्धेत जी ताकद भारतीय संघाकडे दिसून आली ती इंग्लंडकडे दिसलेली नाही. उपांत्य लढतीत अफगाणिस्तान केवळ 15 धावांनी पराभूत झाला होता. या लढतीत इंग्लंडच्या गोलंदाजीच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले आहे.
भारतीय संघाबाबत बोलायचे झाले तर कर्णधार यश धुल, शेख रशीद, राज बावा प्रचंड भरात आहेत. सलामीवीर अंगक्रीष रघुवंशी व हरनूर सिंग उपांत्य सामन्यात अपयशी ठरले असले तरीही त्यांनी या स्पर्धेत सातत्याने धावा केल्या आहेत. गोलंदाजीत राजवर्धन हंगरगेकर, रवी कुमार, निशांत सिंधू व विकी ओस्तवाल यांनी प्रत्येक सामन्यात प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांवर दडपण राखले आहे. त्यांचा सामना करण्याचेच मोठे आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांवर राहणार आहे. त्यांचा कर्णधार टॉम प्रेस्ट व सलामीवीर जॉर्ज थॉमस यांच्यासह जॉर्ज बेल व अलेक्स हॉर्टन हे चारच प्रमुख फलंदाज असून त्यांनाही संमिश्र यश आले आहे. त्यामुळे या सामन्यात भारताचेच पारडे जड राहणार आहे.
सिंधू व ओस्तवाल निर्णायक ठरतील
भारताचे डावखूरे फिरकी गोलंदाज निशांत सिंधू व विकी ओस्तवाल यांनी या संपूर्ण स्पर्धेत प्रतिस्पर्धी फलंदाजांना कोड्यात टाकणारी गोलंदाजी केली आहे. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांसह फिरकी गोलंदाजीलाही मदत मिळते हे जिसून आले आहे. त्यातच बहुतांशी परदेशी संघ फिरकीसमोर नांगी टाकताना दिसतात. शिवाय डावखूरी फिरकी असेल तर व गोलंदाजांनी खेळपट्टीचा पुरेपुर वापर करत गोलंदाजी केली तर इंग्लंडच्या फलंदाजांना या सामन्यात मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागेल.
कोहलीकडून टीप्स
भारताच्या युवा संघाला प्रमुख भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने व्डिडीओ कॉल करुन अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. तूम्ही सगळेच खूप सरस खेळ करत आहात. आता हा सामना जिंकून विश्वकरंडक भारतात घेऊन या. हा तुम्हा सर्वांच्या कारकीर्दीला कलाटणी देणारा विजय ठरणार आहे. कोणतेही दडपण न घेता विजयाची एकही संधी सोडू नका व आपली गुणवत्ता सिद्ध करा, अशा शब्दात कोहलीने युवा संघाला टीप्स दिल्या.