नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांची आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी केली आहे. यासोबत त्यांनी प्रियंका गांधी कोणत्या मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे, हेही सांगितले.
अजय राय म्हणाले, प्रियंका गांधी यांची निवडणूक लढवण्याची इच्छा असल्यास त्या वाराणसीमधून निवडणूक लढू शकतात. त्यांच्यासाठी आमचे कार्यकर्ते काहीही करायला तयार आहेत. अमेठी हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पण, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी 2019 मध्ये कॉंग्रेसच्या गडाला सुरुंग लावला. अमेठी मतदार संघात राहुल गांधी यांचा स्मृती ईराणी यांनी पराभव केला होता.
अमेठी लोकसभा मतदारसंघ आणि कॉंग्रेस कुटुंबियांचे खास नाते आहे. याच मतदारसंघातून याआधी संजय गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. राहुल गांधी यांनीही सलग तीन वेळा अमेठी मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती.