नवी दिल्ली – अंधश्रद्धा निर्मुल समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड नेते गोविंद पानसरे, कार्यकर्ता-पत्रकार गौरी लंकेश आणि अभ्यासक एमएम कलबुर्गी यांच्या हत्यांमागे काही समान धागा आहे का, अशी विचारण सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला केली आहे.
न्या. संजय किशन कौल आणि न्या. सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली. यासंदर्भात मुक्ता दाभोलकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत याचिका दाखल केली आहे.
अंधश्रद्धेविरोधात लढा देणाऱ्या दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात मॉर्निंग वॉक करताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. पानसरे यांची 20 फेब्रुवारी 2015 रोजी, तर लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी हत्या करण्यात आली होती. कलबुर्गी यांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या सर्व हत्या करण्याची पद्धत एक सारखीच आहे.
मुक्ता दाभोलकर यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील आनंद ग्रोव्हर यांनी खंडपीठाला सांगितले की, या चारही हत्येमागे मोठा कट होता. उपलब्ध पुराव्यांवरून असे सूचित होते की ही प्रकरणे एकमेकांशी जोडलेली असू शकतात आणि मुक्ता दाभोलकर यांनी हा मुद्दा उच्च न्यायालयासमोर मांडला होता, असा युक्तिवाद केला.