नवी दिल्ली – केंद्र सरकार केवळ श्रीमंतांना डोळ्यासमोर ठेवून रेल्वेची धोरणे आखत आहे आणि रेल्वेतही गरीबांची लूट चालू आहे. त्यावर अवलंबून असलेल्या भारताच्या 80 टक्के लोकांचा हा “विश्वासघात” आहे, आरोप कॉंंग्रेसनेते राहुल गांधी यांनी केला आहे. मोदींची गॅरंटी म्हणजे केवळ विश्वासघाताचीच गॅरंटी आहे, असा टोलाही त्यांनी लगाविला.
एक्स वरील एका पोस्टमध्ये गांधींनी हा आरोप केला. ते म्हणाले की, “हवाई चप्पल” घालणाऱ्यांना हवाई जहाजाच्या प्रवासाचे स्वप्न मोदींनी दाखवले. पण प्रत्यक्षात गरीबों की सवारी असा ज्याचा उल्लेख होतो त्या रेल्वेपासूनही मोदींनी गरीबांना दूर केले आहे. मोदी सरकारने वेगवेगळ्या मार्गाने दरवर्षी रेल्वे भाड्यात 10 टक्के वाढ केली. डायनॅमिक भाड्याच्या नावाखाली गरीबांना लुटले.
प्रवाशांच्या आरक्षणाचे कॅन्सलेशन चार्जेस वाढवले. प्लॅटफॉर्म तिकीट महाग गेले. त्यामुळे गरीब लोक रेल्वेत पायही ठेवू शकत नाहीत. कोणत्या तरी भारी रेल्वेचे फोटो झळकाऊन लोकांना फसवले जात आहे. प्रत्यक्षात या गाड्यांचे भाडे गरीबांना अजिबात परवडणारे नसते, असे त्यांनी म्हटले आहे.
सरकारने गेल्या तीन वर्षांत ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलती काढून घेऊन त्यांच्याकडून ३,७०० कोटी रुपये वसुल केले आहेत, असा दावा त्यांनी केला. प्रसिद्धीसाठी निवडलेल्या रेल्वे गाड्यांना प्राधान्य देण्यासाठी सामान्य लोकांच्या गाड्या कमी केल्या जात आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना रेल्वेच्या प्राधान्यक्रमापासून वंचित ठेवले गेले आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
“एसी कोचची संख्या वाढवण्यासाठी जनरल डब्यांची संख्या कमी केली जात आहे. केवळ मजूर आणि शेतकरीच नाही तर विद्यार्थी आणि सेवा वर्गातील लोकही या (जनरल) डब्यांमधून प्रवास करतात. एसी डब्यांचे उत्पादनही तिप्पट करण्यात आले आहे. खरं तर रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडण्याची परंपरा संपवणे म्हणजे हे कारनामे लपवण्याचा कट होता, असा आरोप गांधी यांनी केला.