नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. कृषी कायदे शेतकरी विरोधी असल्यामुळे शेतकरी आणि शेतमजूरांचे नुकसान होईल, असे राष्ट्रपतींना सांगण्यात आले. हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सरकारच्यावतीने सांगितले जाते. मात्र शेतकरी या कायद्यांना विरोध करत अहेत, हे सर्व देश बघत आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
कृषी कायद्यावरून सरकारविरोधातील आपली भूमिका अधिक कठोर करताना कॉंग्रेसने आज कॉंग्रेस मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. राष्ट्रपती भवनावरील मोर्चा काढण्यास प्रतिबंध केल्यानंतर कॉंग्रेसने ही निदर्शने केली. कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे खासदार आणि नेत्यांनी पक्षाच्या मुख्यालयाबाहेरच धरणे आंदोलन केले. प्रतिबंधात्मक आदेशांचा भंग केल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
अकबर रोडवरील कॉंग्रेस पक्षाच्या मुख्यालयापासून राष्ट्रपती भवनापर्यंत निषेध मोर्चा काढून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना 2 कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देण्याचे नियोजन कॉंग्रेसने केले होते. मात्र दिल्ली पोलिसांनी राष्ट्रपती भवन आणि कॉंग्रेसच्या कार्यालयाच्या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केले होते. त्यामुळे आंदोलनकर्त्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद, लोकसभेतील पक्ष नेते अधिर रंजन चौधरी यांनी नंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आणि कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली. सर्व विरोधकांचा शेतकऱ्यांना पाठींबा आहे. ज्या पद्धतीने हे कायदे कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर केले गेले आहेत. ते पाहता हे कायदे रद्द केले जायला हवेत. जोपर्यंत हे कायदे मागे घेतले जात नाहीत. तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाहीत. सरकारने संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवावे आणि हे कायदे रद्द करावेत, असेही राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जे पंतप्रधानांच्या विरोधात उभे असतात, त्यांना दहशतवादी ठरवले जाते. जर सरसंघचालक मोहन भागवतांनीही पंतप्रधानांना विरोध केला, तर पंतप्रधान त्यांनाही दहशतवादी ठरवतील. देशामध्ये लोकशाही नाही. जर लोकशाही आहे असे वाटत असेल, तर ती केवळ एक कल्पना आहे.
राहुल गांधी, कॉंग्रेस नेते