Indian Cricket Team Coach Rahul Dravid : भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात प्रवेश केला. जसा संघातील खेळाडूंसाठी हा सामना महत्वाचा आहे तसेच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठीही महत्वाचा ठरणार आहे. या सामन्यानंतर त्यांचा संघाशी असलेला करार संपणार आहे. आता त्यात वाढ होणार नसल्याचे संकेतही द्रविड यांनी दिले आहेत.
रवी शास्त्री यांची मुदत संपल्यानंतर द्रविड यांच्याकडे मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर भारतीय संघाच्या कामगिरीचा आलेख सातत्याने उंचावला गेला. यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत संघाने सलग दहा सामने जिंकत अंतिम फेरीही गाठली. जवळपास एका तपानंतर भारतीय संघ आयसीसीच्या स्पर्धैत विजेतपद मिळवण्याची आशा बळावली आहे.
संघाच्या नेतृत्वातही बदल करण्यात आले. विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माकडे नेतृत्व दिले गेले. त्याचबरोबर द्रविड यांच्या मार्गदर्शनात संघाने अनेक मालिका जिंकल्या. द्रविड यांची या पदावर नियुक्ती झाली त्यावेळी अनेकांनी त्यांना यश मिळेल का अशी विचारणा केली होती. खुद्द द्रविडही ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी फारसे तयार नव्हते. मात्र, त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली होते व त्यांच्या आग्रहाखातर द्रविड यांनी अखेर होकार दिला होता.
द्रविड यांचा करार संपल्यावर भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळणार असला तरीही सध्याच्या सपोर्ट स्टाफमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे तसेच क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांच्यासह सपोर्ट स्टाफचा करार वाढवला जाणार आहे.