राहाता – राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक लाख 32 हजार 316 मते मिळविली. त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांचा 87 हजार 24 मतांनी पराभव केला. शिर्डी विधानसभा मतदारसंघात सकाळी आठ वाजता राहाता तहसील कार्यालयात मतमोजणीस प्रारंभ झाला. प्रथम टपाली मतदानाची मोजणी करण्यात आली. एकूण 20 फेऱ्यांत मतमोजणी झाली. पहिल्या फेरीपासून विखे पाटील यांनी आघाडी घेतली. ती शेवटपर्यंत राहिली. पहिल्या नऊ फेऱ्यांत गणेश परिसर पट्ट्यात राधाकृष्ण विखे यांना 40 हजार मतांची आघाडी मिळाली. नंतर प्रवरा पट्ट्यात ही मतदानाची आघाडी वाढत गेली. मागील पंचवार्षिक निवडणुकीत विखे यांना 75 हजारांचे मताधिक्य मिळाले होते.
या निवडणुकीत शिर्डी विधानसभा मतदारसंघात दोन लाख 26 हजार 683 मतदारांपैकी एक लाख 85 हजार 122 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विखे पाटील यांना 1 लाख 32 हजार 316 मते मिळाली, तर कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांना 45 हजार 292, बहुजन समाज पक्षाचे सिमोन जगताप यांना एक हजार 43, बहुजन वंचित आघाडीचे विशाल कोळगे यांना पाच हजार 788, तर अपक्ष उमेदवार विश्वनाथ वाघ यांना 683 मते मिळाली. नोटाचा वापर एक हजार 596 मतदारांनी केला.
विखे पाटील यांची ही विधानसभेची आठवी निवडणूक आहे. आजपर्यंतच्या राजकीय कार्यकाळात विखे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळविले. विखे पाटील विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, शिर्डी मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा हा विजय आहे. हा विजय मी जनतेला समर्पित करतो. प्रत्येक मतदारसंघात महायुतीची परिस्थिती चांगली होती. परंतु ते का पराभूत झाले, याची कारणमिमांसा करावी लागणार आहे.
महायुतीने राज्यात 200 च्या पुढे जागा मिळतील, अशी अपेक्षा केली होती. परंतु महायुती 164 जागांवरच थांबली. याचाही अभ्यास करावा लागेल. भावनिक मुद्यांचा काही मतदारसंघांत परिणाम झाला का? याचे आत्मपरीक्षण करावे लागेल. शिर्डी मतदारसंघाची मोठी परंपरा आहे. साईबाबांचे आशीर्वाद व स्व. बाळासाहेब विखे यांची पुण्याई, तसेच सामाजिक एकोपा जपल्याने व सर्वासामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेतल्याने आपण विक्रमी मतांनी विजयी झाल्याचे त्यांनी सांगितले.
आपण सर्व समावेशक काम केले. व्यक्तीद्वेषाचे राजकारण केले नाही. तसेच शिर्डी विधानसभा मतदारसंघात भावनिक मुद्दे मांडले नाहीत. विचारांची लढाई विचारांनी केली म्हणून हा मोठा विजय मला मिळाल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले, जनतेने विखे कुटुंबीयांवर टाकलेला विश्वास हाच खरा विजय आहे. हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे.
विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची मिरवणूक काढली. मतमोजणी ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गोविंद शिंदे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुंदन हिरे यांनी काम पाहिले.