ऍड. मोरे अपहरण, खूनप्रकरण : शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडून दुर्लक्ष
पोलिसांकडून तब्बल पाच दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल
पुणे – ऍड. उमेश मोरे यांच्या अपहरण व खून प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्याने दाखवलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पुणे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. नातेवाईकांनी संशयीत आरोपींची नावे देऊन तसेच घातपाताची शक्यता व्यक्त करूनही पोलिसांनी तब्बल पाच दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
यासाठी राज्यातील एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याच्या जवळील वकिलांना तसेच केंद्रातील वजनदार व्यक्तीच्या नातेवाईकांना पुणे पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलावे लागले. ऍड. मोरे यांचा खून अपहरणानंतर काही तासातच घडला, यामुळे पोलीस त्यांचा जीव वाचवू शकले नसते. मात्र, संशयितांची माहिती असूनही त्यांना जेरबंद करण्यास तब्बल 18 दिवस लागले.
ऍड. उमेश मोरे यांचे अपहरण 1 ऑक्टोबरला झाल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी 2 ऑक्टोबरला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. मात्र, तेथील वरिष्ठ अधिकाऱ्याने मिसिंची तक्रार दाखल करायला लावली. यानंतर अखेर नातेवाईकांनी इकडून तिकडून दबाव वाढवल्यानंतर 5 ऑक्टोबरला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. हा तपासही नातेवाईकांनी संशय केलेल्या व्यक्तींना दुर्लक्षित करूनच केला.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याची 5 पथके आणि गुन्हे शाखेची पथके कार्यरत होती. दररोज उमेशचे नातेवाईक पोलीस स्टेशनला जाऊन बसत, तपासाची माहिती घेत. पण फार काही समाधानकारक घडामोडी समजत नव्हत्या, त्यामुळे त्यांचा धीर खचू लागला. अखेर 18 दिवसांनंतर उमेश यांचा खून झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्याच्या आरोपींनाही अटक केली. मात्र, माध्यम आणि नातेवाईकांपासून महत्त्वाची माहिती लपवण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत सुरू होते.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याप्रमाणेच पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारीही जेव्हा गुन्हा उघड झाल्यानंतरही माहिती लपवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा संशय नक्कीच निर्माण होतो.