पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 19 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोव्हेंबरमध्ये प्रमाणपत्र वाटप होणार आहे.
पहिली ते पाचवीच्या वर्गांना शिकविण्यासाठी पेपर क्रमांक 1 व सहावी ते आठवीसाठी पेपर क्रमांक 2 या प्रमाणे उमेदवारांच्या परीक्षा घेण्यात आल्या. पेपर क्रमांक 1 साठी 1 लाख 88 हजार 688 आणि पेपर क्रमांक 2 साठी 1 लाख 54 हजार 596 उमेदवारांची नोंदणी झाली होती. या परीक्षेत एकूण 16 हजार 705 उमेदवार उत्तीर्ण झाले.
करोनामुळे निकाल उशिराने जाहीर झाला. 5 ऑगस्ट रोजी अंतरिम निकाल जाहीर होणार होता. त्यानंतर त्यावर आक्षेप मागवले. दाखल झालेल्या आक्षेपांवर कार्यवाही पूर्ण करून अंतिम निकाल 28 ऑगस्ट रोजी जाहीर झाला. या परीक्षेचे काम महाराष्ट्राबाहेरील एका एजन्सीला दिले होते. करोनामुळे सर्व कामे ठप्प होती. त्यामुळे प्रमाणपत्रे कधी मिळणार, असा प्रश्न उमेदवारांकडून उपस्थित होत आहे.
दरम्यान, प्रमाणपत्रांच्या छपाईचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते ऑक्टोबर अखेरीस पूर्ण होणार आहे. त्यानंतर प्रमाणपत्रांचे वाटप होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांकडून मिळाली.