मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या 11 सदनिकांवर अंमलबजावणी संचनालयाने टाच आणली. या सदनिका सील केल्या असूनही त्याचे बाजारभावाने मुल्य सहा कोटी 45 लाख रुपये आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारमधील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. यातच महाराष्ट्रात ईडीने दोन-चार ठिकाणी कारवाया केल्या म्हणून राजकारण तापले आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेने थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांविरोधात कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईवर राज्यातील राजकीय नेते शरद पवार, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, सुप्रिया सुळे ,आदित्य ठाकरे अशा अनेक नेत्यांनी भाजपावर टीका केली आहे. यातच नागपुरात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले,’भारतात युद्ध नसेल पण आमच्या सारखे लोक सुद्धा रोज युद्धाचा अनुभव घेत आहेत. दिल्लीत एक पुतीन (नरेंद्र मोदी) बसले आहेत, ते रोज आमच्यावर ईडी, सीबीआयचे मिसाईल सोडतात,पण आम्ही त्यातून वाचलोय.’
ते पुढे म्हणाले,’ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या या माध्यमातून बॉम्ब, मिसाईल सोडले जात आहेत. रोज एक मिसाईल येत असून आम्ही त्यातून वाचलो आहोत,” असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान,श्रीधर पाटणकरांवर खोट्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली असून त्या कारवाई मागचे सत्य काही तज्ज्ञ मंडळींनी समजून घ्यावे. हे नीट समजून घेऊन चुकीच्या माहितीवर आधारीत काही गोष्टी प्रसारित केल्या जात आहेत. ही आमच्या विरुद्ध बदनामीची मोहीम असून ती उद्या त्यांच्यांवरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राऊतांनी दिला.
भाजपमध्ये असं कुणीचं नाही का?, आम्ही सर्व पुरावे दिले आहेत. पंतप्रधानांच्या कार्यालयात आणि ईडीकडे आम्ही सर्व पुरावे दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयातून मला पोचपावती मिळाली आहे. मात्र, आमच्या पुराव्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. केवळ सिलेक्टेड कारवाई सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले.