नवी दिल्ली – अमरावती येथे बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मुद्दावर खासदार नवनीत कौर राणा आज लोकसभेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी पोलीस आयुक्तांमांगे सीबीआय किंवा ईडीची चौकशी मागे लावा, अशी मागणी केली.
महाराष्ट्रात आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन केलं. कोणताही गुन्हा केला नव्हता. तरी आमच्यासोबत एखाद्या गुन्हेगारासारखं वर्तन करण्यात आलं. पोलिसांच्या गाडीत बसून आम्हाला आयुक्तालयात नेण्यात आलं. महाराष्ट्रात आमच्यावर अन्याय होतोय. आमच्यासोबत गैरवर्तन करण्यात येतंय, असं नवनीत राणा यांनी म्हटलं.
दरम्यान जानेवारीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्यानंतर मध्यरात्री पुतळा काढण्यात आला. त्यानंतर 100 ते 150 पोलिस आमच्या घरी जबरदस्ती दाखल होतात. माझ्या घरी वृद्ध माता-पिता आहेत. लहान मुलांसमोर आम्हाला वरून आदेश असल्याचं सांगत अटक करण्यात आली. शिवाय आमच्या संबंधीत लोकांवर 307 दाखल करून त्यांच्यावर अत्याचार कऱण्यात आला. आमदार रवी राणा दिल्लीत असताना त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं.
वरिष्ठ महिला अधिकाऱ्याची दखल घेतली जाते. मग मी पण महिला आहे. आमच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या पोलीस आयुक्तावर कारवाई करायला पाहिजे. त्यांच्यामागे सीबीआय आणि ईडीची चौकशी लावावी, अशी मागणीही नवनीत राणा यांनी केली. मात्र संबंधीत पोलीस आयुक्तांचं नाव घेणं नवनीत राणा यांनी टाळलं.