मुंबई – सूर्यफूल तेलाचा मोठा पुरवठादार असलेल्या युक्रेनमधील निर्यातीवर परिणाम झाला आहे. मात्र भारतातील कंपन्यांनी तेलाची गरज भागविण्यासाठी रशियन तेल कंपन्यांकडून 54 हजार टन सूर्यफूल तेल खरेदीचा सौदा केला आहे.
या भारतीय कंपन्यांनी यासाठी मोठी किंमत मोजली आहे. भारतीय कंपन्यांनी तेलासाठी प्रत्येक टनाला 2,150 डॉलर म्हणजे साधारणपणे 1.6 लाख रुपये मोजले आहेत. युद्ध सुरू होण्यापूर्वी सूर्यफूल तेलाची किंमत 1.2 लाख रुपये प्रति टन इतकी होती. भारत हा जगातील सर्वात मोठा खाद्यतेल खरेदी करणारा देश आहे.
युक्रेनमधील उत्पादन वाया जात असतानाच इंडोनेशियाने पामतेल पुरवठा मर्यादित केला आहे. तर दक्षिण अमेरिकेतील सोयाबीन पिकावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत भारताच्या खाद्यतेल साठ्यावर प्रचंड परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांनी रशियाकडून खाद्यतेल खरेदीचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते.
जेमीनी या कंपनीने रशियातील कंपन्याबरोबर 12,000 टन सूर्यफूल तेल खरेदी करण्याचा सौदा केला आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी सोयाबीन व पाम तेलापेक्षा सुर्यफूल तेलाच्या किमती कमी होत्या. मात्र युद्ध सुरू झाल्यानंतर सनफ्लावर तेलाच्या किमती वाढत असल्याचे दिसून आले. युक्रेन आणि लगतच्या देशांमध्ये सूर्यफुलाचे उत्पादन होते. मात्र युद्धामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे आणि या देशातून खाद्य तेलाची आयात करणे अवघड झाले आहे.
रशियावर निर्बंध घातल्यानंतर गेल्या एक महिन्यापासून भारतातील खाद्यतेल आयात करणाऱ्या कंपन्यांनी रशियन कंपन्याबरोबर व्यवहार बंद केले होते.
मात्र आता भारतातील कंपन्या आयातीचे व्यवहार करू लागल्या आहेत. यासाठी भारतीय कंपन्या डॉलरमधून व्यवहार करीत आहेत. युक्रेनमधील बंदरावर परिणाम झाल्यामुळे भारतीय कंपन्यांनी ऑर्डर दिलेले 3 लाख टन तेल बंदरात अडकले आहे. भारत सरकार आणि भारतीय कंपन्या इंडोनेशिया आणि अर्जेटीनातून खाद्य तेल मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र सध्या या तेलाचे भाव वाढले आहे. त्यामुळे रशियाकडून खाद्यतेल आयात करण्यात येत असल्याचे दिसून येते.
……..