नवी दिल्ली – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवली. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्द्यावरून विरोधक एकवटण्याची शक्यता बळावली आहे.
ममतांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठवून केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी भाजपच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन पत्राद्वारे केले. त्या आवाहनाला पवार यांनी एकप्रकारे सकारात्मक प्रतिसाद दिला. एकत्र येऊन काय करता येईल ते आम्ही पाहू. केंद्रीय यंत्रणांच्या छापासत्राचा मुद्दा आम्ही संसदेत मांडू, असे ते येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
त्याआधी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत बोलताना पवार यांनी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावरून केंद्र सरकार आणि भाजपला लक्ष्य केले. आज सत्तेत असणारे त्यांच्या विचारसरणीशी सहमत नसलेल्यांना शत्रू मानतात. राजकीय प्रतिस्पर्ध्यांना त्रास देण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचे छापासत्र घडवले जात आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस नेत्यांबाबत ते घडत आहे. जनतेची इच्छा काहीही असो; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीर ते कन्याकुमारी भाजपची राजवट हवी आहे, असा शाब्दिक हल्लाबोल त्यांनी केला.