सासवड – पुरंदर तालुक्यातील ३२ हजार मतदार हे सांगली जिल्ह्य़ातील असल्याचा आरोप करून मुख्यमंत्र्यांच्या ओळखीचा दुरूपयोग करून, प्रशासनाला हाताला धरून माजी आमदार विजय शिवतारे यांच्या तक्रारीवरून तहसीलदारांनी विद्यमान आमदार संजय जगताप यांसह पुरंदर तालुक्यात पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असणाऱ्या अनेक गावच्या आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह ३२ हजारांहून अधिक नागरीकांना नोटीसा बजावल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुरूवारी (दि ४) सासवड येथील नवीन प्रशासकीय कार्यालयात हजारो नागरीकांचा आक्रोश दिसला. शिवतारेंबाबत अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी शिवतारे आणि शासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी, आधी हरकत घेणा-या विजय शिवतारेंना येथे उपस्थित करा मग सुनावणीला सुरूवात करा, सुनावणीला आलेल्या सर्व नागरीकांच्या चहापानाची व्यवस्था करा, त्यांना दिवसाची रोजंदारी द्या, अशा मागण्या यावेळी आमदार संजय जगताप यांनी करीत प्रशासनाच्या चुकिच्या कामकाजाचा निषेध व्यक्त केला.
सर्वसामान्य नागरिकांबरोबर लोकप्रतिनिधी असणाऱ्या मला तसेच अनेक आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना याबरोबरच काही पत्रकारांनाही नोटीस आल्या आहेत. हरकत घेणारा काय सरकारचा जावई आहे का… असा प्रश्न उपस्थित करीत आमदार संजय जगताप यांनी, सर्वसामान्य नागरिकांना मतदानापासून वंचित ठेऊन लोकशाही आणि संविधानाचा खुन करण्याचे कारस्थान असल्याचा आरोप केला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आमदार संजय जगताप यांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार विक्रम रजपूत यांना (दि ४) जानेवारी रोजीच्या होणा-या चुकिच्या पध्दतीने बजावलेल्या नोटीसांबाबतच्या सुनावणीवेळी शासनाने नागरीकांची सर्व व्यवस्था करण्याची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात सुनावणी दिवशी मात्र नागरीकांची कोणतीही सोय न करता तीन वेळा ठिकाणे बदलून जेष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव आणि सर्वसामान्यांची गैरसोय केली. हवेलीतील भागात अतिक्रमणाच्या नोटीस बजावून नागरीकांना रोखण्याचा प्रयत्न केला., असेही नागरीक म्हणाले.
करायला गेला गणपती… झाला मारूती
माजी आमदार विजय शिवतारे यांचा २०१९ मध्ये ३१ हजारांहून अधिक फरकाने पराभव झाला होता. त्यामुळे आता ३२ हजार मतदार बोगस नोंदवील्याचे आरोप आमदार संजय जगताप यांच्यावर करून मुख्यमंत्र्यांच्या ओळखीचा दुरूपयोग करून प्रशासनाला चुकिच्या पध्दतीने नोटीसा बजावायला लावून स्टंट करण्याचा प्रयत्न केला.
पोलीस आणि शासनाची यंत्रणेकडून नागरीकांना नाहक त्रास देण्यात आला. सर्वसामान्य आणि वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या पुरंदरमध्ये राहणाऱ्यांना नोटीसा दिल्यामुळे सर्वसामान्य जनतेत मोठा आक्रोश पहायला मिळाला. यामुळे शिवतारेंची गत म्हणजे ” करायला गेला गणपती… झाला मारूती ” अशी झाल्याची चर्चा सुनावणीसाठी आलेल्या नागरीकांत होती.
अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न
यावेळी, सासवड येथील डॉ. दिपक जगताप यांनी सांगितले की, मी सुनावणीला गेलो असता अधिका-यांना माझे दुसरीकडे नाव असल्याचा पुरावा दाखवण्याची मागणी केली. त्यावर अधिका-यांना उत्तर देता आले नाही. प्रशासनाने भलत्याच मतदार संघातील मतदारांच्या नोटीस आम्हाला देऊन वेळ खराब करण्याचे आणि नाहक त्रास देण्याचे काम केले आहे. आम्ही पिढ्यानपिढ्या पुरंदरमध्ये वास्तव्यास असून आमचे अस्तित्व मिटवण्याचे काम सुरू असल्याच्या भावना, डॉ. दीपक जगताप यांसह अनेक जेष्ठ नागरीक, महिलांनी व्यक्त केल्या.
नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन –
अनेक महिने काम पुर्ण होऊनही केवळ श्रेयवादासाठी उद्घाटनाच्या फार्ससाठी शिवतारेंनी आवडलेल्या पुरंदरच्या नवीन प्रशासकीय कार्यालयाचे उदघाटन याप्रसंगी जेष्ठ महिलांच्या हस्ते करण्यात आले.
माझे नाव पुरंदर मतदार संघात राहणार का -आमदार संजय जगताप
बाजारबुणग्यांच्या नादी लागून सर्वसामान्य नागरीकांना वेठिस धरणा-या प्रशासनाला जाब विचारणार असून त्यांना आदेश देणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्तांना आणि मुख्यमंत्र्यांना याचा जाब विचारण्यासाठी (दि ९) रोजी मुंबई येथे उपोषण करणार असल्याचे आमदार संजय जगताप म्हणाले. माहूरच्या माजी ग्रामपंचायत सदस्या मंजुषा गोळे यांचे नावच आजच्या सुनावणीत डिलीट करण्यात आले असून माझे नाव या मतदारसंघात राहणार आहे का ? असा प्रश्नही आमदार संजय जगताप यांनी तहसीलदारांना केला.
पोलीस बंदोबस्त कशासाठी –
नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून दोन दिवस आधी सर्व सुविधा उपलब्ध करण्याबाबत कळविले होते; मात्र कोणतीही सुविधा उपलब्ध केली नाहीच याउलट तीन वेळा ठिकाणे बदलून नागरीकांचा रोष ओढवून घेतला. एरवी पोलीस कर्मचारी कमी असल्याचे सांगणारे पोलीस खात्यात आज मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एवढा पोलीस बंदोबस्त कशासाठी असा प्रश्न याप्रसंगी नागरीकांनी उपस्थित केला.
प्रशासनाचा भोंगळ कारभार – दिलीप गिरमे
दोन अडीच तास ताटकळत रहावे लागते आहे… चुकिच्या पध्दतीने कामकाज सुरू आहे, मोठ्या प्रमाणात प्रशासकीय चुका आहेत असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व नोटीस आलेले नागरीक दिलीप गिरमे यांनी सांगून प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला. आत गेल्यावर केवळ मतदार नाव कायम असल्याचा शिक्का मारून पाठवण्यात येते. मग सुनावणीचा फार्स कशासाठी असा प्रश्न नागरीकांनी उपस्थित करून गोरगरीब जनता चुकिच्या पद्धतीने शासनाच्या दरबारी बांधण्याचे काम केल्याच्या भावना व्यक्त केल्या.