कराड – जगात साखरेला गतवर्षी चांगला दर होता. यावेळी महाराष्ट्रातही साखरेचे उत्पादन चांगले झाले होते. मात्र, राज्यातील साखर कारखानदारांनी एफआरपीची मोडतोड करून काटामारी करत शेतकऱ्यांचे शोषण केले. तसेच उसाला कमी दर देऊन साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांचा विश्वासघातही केला, असा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केला.
कारखानदारांनी गतवर्षी शेतकऱ्यांचे केलेले शोषण आणि चालू गळीत हंगाम सुरू होऊनही जाहीर न केलेला ऊस दर याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने आज सोमवारी दि. 24 रोजी दिवाळीदिवशीच कराड तहसील कार्यालयासमोर खर्डा भाकर आंदोलन करून राज्यातील साखर कारखानदारांचा तीव्र निषेध नोंदवला. याप्रसंगी पाटील बोलत होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव यांच्यासह संघटनेच्या इतर जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पंजाबराव पाटील म्हणाले, “”गेल्या चार वर्षात साखरेचा वर्षाला 200 रुपयांनी भाव वाढत गेला.
मात्र, याउलट दरवर्षी ऊसाचा 100 रुपयांनी भाव कमी होत गेला. याची खात्री आता राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाली असून शेतकऱ्यांमध्ये कारखानदारांबद्दल तीव्र नाराजी आहे.” त्यामुळे यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संघटित होऊन राज्यातील साखर कारखानदार चालू गळीत हंगामातील ऊस दर जाहीर करत नाहीत, तसेच एक रकमी एफआरपी अधिक एक हजार रुपये दर देत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाला कोयता लावू नये, असे आवाहनही श्री. पाटील यांनी यावेळी केले. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, विश्वास जाधव व अन्य पदाधिकारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी साखर कारखानदारांच्या कारभाराविरोधात आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी कराड तालुक्यासह आसपासच्या परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.