अतिवृष्टीमुळे शेतकरी दुहेरी संकटात : पंचनामे करण्याची मागणी
राहुल गणगे
पुणे – गेल्या महिनाभरात जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे एकीकडे पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊन शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. तर दुसरीकडे हवेली तालुका तलाठी संघाच्यावतीने 17 ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तलाठी भाऊसाहेबांच्या संपामुळे हवेली तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे तलाठी संघटनेचा संप तर दुसरीकडे नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांची पंचायत होऊन बसली आहे. यावर महसूल प्रशासन काय तोडगा काढणार? याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तपासण्याची आणि पंचनामे करण्याची जबाबदारी ज्या तलाठ्यांची असते तेच हवेली तालुक्यातील तलाठी थेट संपावर गेले आहेत. ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी शेतीला तळ्याचे स्वरूप आल्याने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे लवकर व्हावेत. यासाठी शेतकरी तलाठी, तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत. परंतु तिथे गेल्यावर समजते की तलाठी महोदय संपावर गेले आहेत.
महसूल यंत्रणेतील तलाठी हा महत्त्वाचा दुवा आहे. गावोगावच्या गाव नोंदीपासून तर सातबारा उताऱ्यापासून इतरही महत्वाच्या कामांसाठी तलाठी कार्यरत असतो. गेल्या आठवड्यापासून तलाठी आंदोलनावर ठाम आहेत. पिकांत पाणी साचल्याने शेतजमिनी नापिक होण्याची समस्या निर्माण झाली आहे. भाजीपाल्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पिकांमध्ये पाणी साचल्याने कोबी, मिरची, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर आदी पिके सडू लागली आहेत. तर काही ठिकाणी पावसाचे पाणी साचून पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे पिकांचे पंचनामे करुन सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे आहे.
एकीकडे शेतमालाला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. तर दुसरीकडे अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीच्या यातना शेतकरीवर्गाना दरवर्षी सहन कराव्या लागत आहेत. राज्य, केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर करत असते. परंतु प्रत्येकवेळी तलाठी संप, आंदोलने आदी कारणांमुळे दीनदुबळा शेतकरी वंचित राहत आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा आर्थिक विवंचनेत सापडत आहे. याबाबत तालुका प्रशासनाने पर्यायी सुविधा उपलब्ध करण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु याबाबत राज्य, केंद्र सरकार याबाबत काय नवनिर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.