केजरीवाल, मोदींवर प्रखर टीका
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी खोटी आश्वासने देत आहेत, मात्र कॉंग्रेस असे कधीच करणार नाही, असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर प्रखर शब्दांत टीका केली.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आज पंजाब दौऱ्यावर असून, पटियाला येथे त्यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुखबीर सिंग बादल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
निवडणुकीच्या तोंडावर जनतेला आश्वासने देणाऱ्या नेत्यांवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, निवडणुकीच्या काळात अनेक राजकीय पक्ष खोटी आश्वासने देत आहे. मात्र, मी खोटी आश्वासने देणार नाही.
तुम्हाला खोटी आश्वासने ऐकायची असतील तर मोदीजी, बादलजी आणि केजरीवालजींना ऐका. मला फक्त सत्य बोलायला शिकवले गेले आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठीच हे नेते खोटी आश्वासने देत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.