महादेव जाधव
फुरसुंगी – उरूळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे महापालिकेतून बाहेर पडल्याच्या मुद्यावर उच्च न्यायालयाने महापालिकेस स्पष्ट आदेश देत ही गावे महापालिकेतच असून त्यांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेचीच असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, ही दोन्ही गावांना दुय्यम वागणूक महापालिका प्रशासनाकडून वागणूक मिळत आहे. यामुळेच भीषण पाणीटंचाई भासत असताना ऊरुळी देवाची व फुरसुंगी परीसरात टॅंकरने पाणी पुरवठा करण्याकडेही दुर्लक्ष होत आहे. यातून टॅंकर आलाच तर पाणी भरण्यासाठी नागरिकांना जीवघेणी धावपळ करावी लागत आहे.
पुणे महापालिकेच्या कचरा डेपोमुळे फुरसुंगी-उरुळी देवाची परीसरातील सर्व नैसर्गिक जलस्त्रोत दूषित झाल्यामुळे गेल्या 15-20 वर्षांपासुन या दोन्ही गावांत पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यासाठी अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषण करीत येथील नागरिकांनी महापालिकेशी लढा दिला आहे. त्यानुसार पालिकेने उरुळी व फुरसुंगी गावाला पिण्याचे शुद्ध पाणी देण्याचे मान्य केले. या गाव परीसरात कोट्यवधींचा निधी खर्च करून जलवाहिन्याही टाकण्यात आल्या. मात्र, यातील बहुतांशी जलवाहिन्यांत आजपर्यंत पाणी सोडण्यात आलेले नाही.
यंत्रणा असली तरी पाणीपुरवठा नाही, अशी अवस्था या दोन्ही गावांची झाली आहे. काही ठिकाणी अद्यापही अपुरा तसेच अनियमीत पाणी पुरवठा होत आहे. गावांचा समावेश पालिकेत झाल्यानंतर मुबलक पाणी पुरवठा होईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. परंतु, वाढीव मिळकतकराच्या मुद्यावर ही दोन्ही गावे महापालिकेतून बाहेर पडली. परंतु, त्यावर अद्यापही ठोस निर्णय शासनाकडून निर्णय झालेला नाही तसेच याविरोधात एका गटाने न्यायालयात याचिका दाखल केल्याने सदर दोन्ही गावे ही अद्यापही पालिकेतच असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिकेने या गावांना पाणी पुरवठा करणे बंधनकारक असतान पालिकेकडून या दोन्ही गावांना दुय्यम वागणूक दिली जात आहे.
टॅंकरभोवतीच वाद…
उरूळी देवाची आणि फुरसुंगीत बारमाही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी रात्री-अपरात्री नागरिकांना भटकंती करावी लागते.पहाटेपासुनच पाण्याच्या टॅंकरची वाट नागरीकांना पाहात असतात. तरीही पुरेसे पाणी मिळत नसल्याने टॅंकर भोवती जाम झालेल्या नागरिकांमध्ये वाद होत आहेत.
महापालिका प्रशासनाने कचराडेपो बाधित या गावांना पाणी देणे बंधनकारक असताना केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम पालिकेचे अधिकारी करीत आहेत. पाण्याचे केवळ टॅंकर पाठविण्यापेक्षा या गावांसाठीच्या पाणी पुरवठा योजनांचे काम तातडीने पूर्ण करा. अन्यायच करणार असाल तर आम्हाला न्यायालयाची दारे उघडी आहेत.
– भगवान भाडळे, अध्यक्ष, कचरा डेपो हटाव संघर्ष समिती